शनिवार, एप्रिल ०५, २०१४

अस्वस्थ मनातील नोंदी … १



मी अद्याप जिवंत कसा? कि नाहीच? ज्या तऱ्हेने दिवस जाताहेत त्या वरून काही अंदाज बांधताच येत  नाहीत. रस्त्यावर उभा असलेल्या रहदारी नियंत्रक शिपाया सारखा झालोय मी ! निर्देशित वाटेवरून सुसाट धावताहेत मोटार, स्कूटर, टांगे …. अन तो त्याच चौरस्त्यावर, त्याच  स्थितीत …. हात वेडे वाकडे करत , हे असं कां होतंय? ह्याच्या मागील संकेत काय?

ह्या बेकारीच्या आयुष्यात मनात सतत प्रश्नांच्या माशा घोंघावत असतात … हो, प्रश्न हे माश्यांसारखेच, सुखाला चिटकून बसतात, दु:खावर घोंघावतात …

प्रश्न उभा राहतो साऱ्या अस्तित्वाबद्दल , कुठल्या आशेवर माणूस जगात असतो? कुठल्या विचाराच्या बळावर अस्तित्व टिकून असते? अखेर अस्तित्वाची ओळख कुठली? जिवंतपणाची खूण  कुठली? …. अर्थशून्य श्वासांचा व्यापार? हृदयाचे निर्वात स्पंदन कि नदीचा बेताल ठेका? दर क्षणी सामोरी येणारी व्यक्ती मूकपणे डोळ्यातून प्रश्न विचारते, "तू जिवंत कां ?"  उत्तर - खुदा जाने ! त्या व्यक्तीला मीही विचारू लागतो "तू जिवंत कां ?" उत्तर - खुदा जाने!
खर तर जगात जगत कोण नाही? सारेच !! रोगी, जोगी, योगी, भोगी … ताठ, तुटलेले, उन्मळलेले….  सुखी, दु:खी, समाधानी … मोडलेले,जोडलेले, कोलमडलेले …. झाडून गेलेल्या बोटांचे महारोगीही जगात असतात एक स्पर्श- शून्य आयुष्य! गटारगंगेच्या काठी गलिच्छ झोपडीत जगत असतात भिकारी एक चेतनाशून्य आयुष्य ! सुखाची  सूज चढलेले श्रीमंत जगत असतात एक बुभुक्षित आयुष्य ! एक दोन सूर निखळूनही सारे गातच असतात एक बेसूर गीत जीवनाचे … ! कां ? काहीतरी मिटून गेलय, निसटून गेलंय,  मिटून गेलंय, संपून गेलंय ह्याची जाणीव असूनही, ठेवूनही प्रत्येकजण जगतच असतो एक प्रश्न खोल तळाशी दडवून …
प्रश्न :  मी जगतोय, मी जिवंत आहे, पण कां ???????
ह्या कां ला उत्तर नाही ……

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा