रविवार, मार्च ०१, २०२०

प्रश्न नजरेचा होता ..

डोळ्यात कधी धुकं तर कधी कडा पाणावलेल्या. हे असं कविताबिविता वाचतानाच होत नाही, वर्तमानपत्र वाचताना सुद्धा होतं हे हिच्या लक्षात आलं. मी सांगत होतो दृष्टिकोन बदलून बघतो. पण ऐकेना. आताशा ही सुद्धा कातर होते, कात्रीत वगैरे धरत नाही. मग माझ्या कलाने  घेत म्हणाली "अहो, ते मेळाव्यात वगैरे जाता, चेहरे मोहरे नीट नकोत  का दिसायला ?"

मग गेलो डॉक्टर कडे. यंत्राच्या सहाय्याने डोळ्यांत डोळे घालून त्यांनी निदान केलं. "नजर स्वच्छ नाही !"  डॉक्टर बाईमाणूस ! नेमकं निदान केलं.  हे ऐकून हिचा चेहरा कसा झाला हे दिसलं नाही, हे एक बरं.
सारांशात, दोन्ही डोळ्यातली जळमटं काढली गेलीत.

सध्या दोन डोळे कामकाज  वाटून काम करताहेत. एकाने दूरदृष्टी घेतली तर दुसऱ्याने लघुदृष्टी ! ह्या लघु-गुरु दृष्टिकोनामुळे जगाची लगावली समजू उमजू लागेल अशी  आशा करायला  हरकत नाही.

सध्या डोळ्यांत तासातासाने अभिषेक  सुरु आहे, ६५ दिवसांचे व्रत संपले कि जगाकडे स्वच्छ नजरेने पहायला मोकळा ....
       
आता जरा थंडाईचा आस्वाद घेतो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा