सोमवार, ऑक्टोबर २२, २०१८

गाठोडे - पुरचुंडी सणवारांची


गाठोडे - पुरचुंडी सणवारांची

आज शरद पौर्णिमा. लक्ष्मी पूजनाचा दिवस. मी असे म्हटले तर काही लोक "मसाला दूधात काय भांग वगैरे टाकली का?" असा प्रश्न विचारू शकतात. एकूणच माणूस आपला तोच अनुभव खरा, आपला तोच विश्वास सत्य, आपण तेव्हढे महाज्ञानी ह्या भूमिकेतून फटकन निर्णय देऊन मोकळे होतात. काही वेगळ्या शक्यता असू शकतात ही लवचिकता क्वचितच बघायला मिळते. आज देशातला एक मोठा भूभाग कोजागिरी पौर्णिमा वर्षा ऋतूची समाप्ती आणि शरद ऋतूचे आगमन म्हणून चांदणीय रात्री मसाला दूधाचा आनंद घेतो. तर बंगाल, ओरिसा आसाम ह्या पूर्व भागात आजच्या रात्री लक्ष्मी पूजन होते. ज्या कार्तिकी अमावस्येला - दिवाळीला आपण लक्ष्मी पूजन करतो त्या दिवशी पूर्व भारतातले निवासी काली पूजन करतात.

अमावस्या हा दिवस बहुतेक लोक अशुभ मानतात, दिवाळी हा अपवाद ! अमावास्येला कुठलंही नवे  काम करू नये  असा एक संकेत पाळला जातो. १९९० साली चंद्रशेखर अचानक भारताचे पंतप्रधान होऊ घातले. मी त्यावेळी चेन्नईला रहात होतो. ते पदाची शपथ कधी घेतील याचा कयास बांधताना नागराजन हा सहकारी म्हणाला  " ऑफकोर्स ऑन न्यू मून डे." चंद्रशेखर हे बिहारी आहेत आणि त्यांच्या दृष्टीने अमावस्या  शुभ असू शकत नाही अशी शंका देखील त्याला आली नाही.              

दिवाळी सणाच्या अनेक कथा प्रचलित आहेत आणि त्यानुसार सण साजरा करायची पद्धत वेगवेगळी असेल वेगवेगळ्या भागात, मात्र तो साजरा संपूर्ण देशात होतो. असे सर्वच सणांचे नाही. राखी आणि होळी हे सण दक्षिणेत साजरे होताना मी बघितले नाहीत. चेन्नईतल्या सावकारपेठेत मात्र हे सण साजरे होत, कारण तिथली मारवाडी वस्ती. ज्या उत्साही वातावरणात महाराष्ट्र, गुजराथ येथे गणेशोत्सव साजरा होतो तसा  इतरत्र होत नाही. उत्तर भारतात तर गणेश चतुर्थीची सुट्टी देखील नसते. कुठल्या प्रदेशात कुठल्या सणाचे महत्व ह्या साठी त्या त्या प्रदेशातील बँक हॉलीडेस ची लिस्ट पहावी.

इंदूर मधील सणांची मजा आणखीन निराळी. होळकरांमुळे ह्या शहरावर महाराष्ट्रीय संस्कृतीचा प्रभाव बरीच वर्षे टिकला. त्यामुळे गुडीपाडव्याला घराघरांवर  उभारलेल्या गुढ्या मोजायला आम्ही निघत असू. स्नेहलतागंज, रामबाग, नारायणबाग, इमलीबाजार, नंदलालपूरा ह्या मराठी वस्तीतून फिरलो कि २००-३०० गुढ्या सहज मोजता येत. श्रावण मासी हर्ष मानसी येत असे तो सणांची रेलचेल असते म्हणूनच. मला आठवतंय, शाळांमध्ये श्रावणी सोमवार आणि शनिवार अर्धा दिवस सुटी असे , संध्याकाळी उपवास सोडायचा म्हणून. जन्माष्टमी देखील घरोघरी साजरी होई . फुलांची झकास आरास वगैरे करून लंगडा बाळकृष्ण आरामात लाड पुरवून घ्यायचा . आरास करायला फुले, पाने आमच्या मामाच्या "गुलशन नर्सरी'तून  आणायची. तळमजल्यावर राहणारे दद्दाजी (ठाकूर) हा सण जोरात साजरा करत. त्यांचा मोठा मुलगा - लल्लू भैया बाळाच्या रडण्याचा ट्या हा आवाज झकास काढे.                      
श्रावण सुरु होता होता गणेशोत्सवाची तयारी सुरु होई ती म्हणजे उत्सवाचे मंडळ निवडून  नाटक कुठले बसवायचे हे ठरवण्यापासून ...

               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा