बुधवार, सप्टेंबर १८, २०१९

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले तिसरे पान*

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले तिसरे पान*

माणसाच्या हातांत काय असतं ? जन्मतःच मूठ आवळून येणारा हा प्राणी स्वत:च भाग्य लपवत येत असेल असं वाटत नाही. निश्चितच तो झाकत असणार नियतीने हातावर कोरलेल्या जखमा ... आयुष्यपटलावर निरनिराळ्या समयी रंगणारे  रंग .... घटना घडतात त्या नियतीच्या नियमांनी, कुठे तरी दडून बसलेल्या 'सावल्या' अचानक गाफील क्षणी झडप घालतात आणि सारं आकाशच काळवंडून जातं ... दिवसांचे पंख कापले जातात ... भराऱ्या अर्ध्यावरच मोडून पडतात ... आयुष्यात कमावलेलं, जोपासलेल सारं पिंजून निघतं . एका नव्या आयुष्याची सुरुवात होते . पण अखेर पर्यंत 'तो' क्षण सिंदबादच्या पाठीवरील म्हाताऱ्यासारखा खदखदत नाचवत असतो.   

कुठे काय चुकले? काय कमी पडले? कुठल्या पापाची फळं  वेळ साधून जिंकून गेली  ? साऱ्या उभारीची दैना उडवून टाकण्याची बेसावधता कशी आली? प्रश्नांची वटवाघुळं साऱ्या आयुष्याची कातरवेळ करून टाकतात. पण चुकलेले कुठेच नसते. सारे तसेच घडायचे असते. नेमके, बिनचूक! नियतीचा तोलकाटा कधीच ढळत नाही. सावधानता कधी असूच शकत नाही ! बेसावधपणा जन्माबरोबरच पुजलेला असतो; सावली सारखा - प्रकाशात अस्तित्व जाणवून देणारा     

पदरात पडलेल्या कवड्याही प्रसाद म्हणून जतन  करणारेच जास्त. म्हणून त्यांच्या जखमाही खोल... सलही विलक्षण ... पात्रात पडलेले कवड्यांचे दान उधळून लावणारे नेटाने जगतात पण सतत दडपणाखाली.

 भिरकावून लावलेल्या कवड्या सतत खुळखुळत असतात सद्विवेकाच्या सारीपटाशेजारी ....   
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%
भिरकावून देण्यासाठीच असेल हे अस्तित्व वारंवार 
तर कशासाठी जपल्या श्वासांच्या खुणा 
मी एकटाच नव्हतो त्या वळणावर अनिवार 
तूही सामील त्या जल्लोषात पुन्हा पुन्हा ... 

बिन नाळेचाच जन्मलोय मी 
तुझ्यामागे नियमांचे धागे अनंत 
उजाड माळावर सावली हरवून 
भुताड  झालोय ह्याची तुला कशाला 
मलाच खंत ...

सावली सुद्धा निघून जाते संधी साधून
जेव्हा दाटून येते भयाण रात्र काळी,
भर दुपारी, तापत्या उन्हात सावली हरवून
भुताड व्हायच तेवढ मात्र माझ्या भाळी।

१९७२

SANY0105%5B1%5D.JPG (87×99)

२ टिप्पण्या: