शनिवार, एप्रिल २६, २०१४

अस्वस्थ मनातील नोंदी ४

पहिल पान ! 
कुणासाठी ? 
अजून ही प्रश्नांची सोबत संपत नाही. उत्तरं माहित नसलेले हे प्रश्न पावसाळी ढगांसारखे मनभर धून येतात आणि तसेच लोंबकळत रहातात, बरसत नाहीत, जातही नाहीत. मळभाचे दाट थर मात्र वाढतच रहातात. पावसाळी ढगांसारखे धावून येणारे हे ढग जलद मात्र नसतात; असतात निर्जल, फिकट, पांढुरके ढग. स्वत:चा माझ्या अस्तित्वाशी संबंध दर्शवणारे, लोंबकळत राहणारे, वटवाघूळा  सारखे अवस्थाहीन !

वटवाघुळ  !!!! भाळावर बहुदा तोच गोन्दवलेला असणार.  पण निव्वळ प्रतिक मात्र … कारण खऱ्या वटवाघुळा उ:शाप असतो निशा - दृष्टीचा, रात्रीच्या अंधारात गवसते त्याला आकाश, जाणवतात भरारी घेऊ शकणारे पंख. मात्र भाळावरच्या माझ्या वटवाघूलांच्या स्वप्नाचे गरुड देखील देखील उडत नाहीत. डोळाभर माखून असते नाकर्तेपणाची निर्लज्ज काळी वेदना …. वेदना, पण ती तरी सच्ची आहे का? भळभळत्या जखमेपोटी निपजणाऱ्या वेदनेला असते आकाश भेदून काढणारी भव्यता आणि इथे टचकन थेंबही येत नाही तेजोहीन नेत्रात … जखमांचा पत्ता नाही कि जखमाच वांझ आहेत म्हणून वेदनेची चव नाही ?  ऐलथडी - पैलथडी पण ज्याला ऐल नाही आणि पैल हे नाही अशा प्रवाहात अडकलेला मी …

पण मग आकाश आकाश म्हणून काल ज्याचा जयजयकार झाला तो कोणाचा ? आकाश … एक निरस्तित्व ! पण आक्षितिजतेच्या पुण्याईन पण फसव्या पण देखण्या निळ्या झिलाईन भव्यतेच मानक झालेलं … आणि मी जर आकाश असलो तर चंद्र सूर्याचे डोळे चेहऱ्यावर मढवायला  हवे. पण चंद्राची शीतल दाहकता आणि सूर्याची तेजाळ प्रसन्नता सहन होईल मला? नसेल तर हे उधारीच आकाशपण झुगारून द्यायला हवे पण कसे शक्य आहे ते? जे दिसत ते नाकारण्याची अपार्थिव ताकद आहे कुणात! दिशांतापर्यंत पसरलेली मुग्ध निळाई आकाशाची नाही तर कशाची प्रतिक?

प्रतिक ! प्रतिक ! प्रतिक !स्वत:च्या अस्तित्वाभोवती पसरलेलं एक मुखवटेदार धुकं. … धुकं ज्यात सामावलेली असते एक गूढ रम्य सृष्टी. प्रतिक म्हणजे स्वत:च्या माथ्यावर दुसर्याच्या गोष्टीच ओझ वाहणारा हमाल. म्हणजे पुन: 'मी' पण हरवलेलं … तेच तर शोधतोय सर्वदूर.  गीतातून, सुरातून ….  विज्ञानातून , गणितातून … पुस्तकातून, गुलमोहरातून … लिहिण्यातून, वाचाण्यातून, बोलण्यातून, …. जखमेतून, वेदनेतून … परंतु सारा शोध असफल! प्रत्येकाच्या शेवटी आढळते ती मन व्यापून टाकणारी फ़ोलता …. पोकळी प्रसवणारी अपयशाची असहायता …. पण तरीही तरंगत असते कुठेशी, कुढणारी का होईना पण आशा … आकांक्षा …. स्वत्व गवसेल, स्वत्व गवसेल म्हणून कानाशी रुंजी घालणारी !

आशा - निराशा, जयपराजय, उमेद - हतबलता, भव्यता- खुजेपण, असहायता - भरारी … द्वंद्व ! द्वंद्व! कधीच जिंकणार नाही का मी या द्वंद्वात? दोन ही तीरांवर पाय रोवलेले. निराशेने असहाय होऊन आत्मघाताकडे झुकू पाहणाऱ्या एका मनाला लगेच सुचतो, विवेक, विचार . पण काहीतरी गवसल्यावरही पुढे पसरलेला लांबच लांब रस्ता ' मुक्काम' न आल्याची खंत करायला लावतो. ( मैलांचे दगड जिंकल्याच्या का कधी जाहिराती होतात?) माणूस अल्पसंतुष्ट आणि समाधानी असला कि आकांक्षा विहीन ठरतो आणि क्षितिजाला भिडायच्या प्रयत्नांत अस्तंगत सूर्यासारखा रक्ताच्या थारोळ्यात पडला तर जिद्दी आणि झपाटलेला ठरतो.

समस्त आदर्शांना आणि स्वप्नांना बाटलीबंद करून ठेवून व्यवहाराच्या राज्यात शिरला तर भोगवादी आणि आदर्शांच्या कळाहीन रंगहीन निवडुंग बागेत फिरला तर येडा!

अखेर यशाचं गमक काय? पैसा, कीर्ती, नांवलौकिक, मोटर बंगला, सचोटी आणि नितीमत्तेची जोपासना कि मुत्सेद्दीगिरी?

 विचार …  विकारांना निमंत्रण देणारे आणि हाकलूनही देणारे मनाचे पहारेदार … मात्र हा भोवरा भयंकर आहे, वेड  लावणारा आहे …. एक कधीच न 'जगू' देणारा शाप  आहे ! गती आहे पण प्रगती नाही आणि अडकणाऱ्याची अधोगती !!!!!

रविवार, एप्रिल २०, २०१४

अस्वस्थ मनातील नोंदी …५


संस्कृती ह्या राजमान्य अधिकाऱ्याच्या  माणूस दडपून टाकतो आपली सहज,  स्वाभाविक , नैसर्गिक भूक।खर तर आदि कालात संस्कृती   नामक  शब्द योजण्यात आला तो संतुष्टी, तृप्ती , सहज -साध्य, आकारबद्ध प्रवासाने मिळालेली व्हावी म्हणून. संस्कृतीपूर्व काळात, जाणवलेल्या भुका एकमेकांच्या मदतीने भागवल्या जाव्या, त्या पुर्तिला एक रूप असावे, एक गंध असावा, त्या तुष्टीला एक रंग असावा, म्हणून सभ्यता, संस्कृती, आचार, ह्या शब्दांची व्याख्या झाली. आपली प्रत्येक कृती, प्रवासातला हर एक टप्पा माणूस ह्या कसोट्यांवर घासून पाहू लागला. नव्या वाटा, नवे मार्ग आखले गेले. नव्या अनुभवांचा अनुनुभूत आनंद मिळाल्याने संस्कृतीचा सत्कार झाला, आचारांचा आदर झाला. सभ्यतेला मान मिळाला. त्या सर्व भुका, त्या सर्व ओढी ह्या वाटांनी परिपूर्ण झाल्याही असतील. परंतु आज?
आचार हे  सामयिक आणि स्थानिक असतात. मूळ उद्देश जरी सार्वकालिक आणि व्यापक असले तरी उत्क्रांतीमुळे निश्चितच त्यांना पैलू पडत जातात. परंतु ह्याचे भान न ठेवता त्याच जुन्या, बुरसट   आणि गंजलेल्या मुल्यांभोवतीच आमचा पिंगा चालू असतो आणि जीवन हे अतर्क्य, निरर्थक आणि गोंधळलेले वाटू लागते. ज्या भूकांभोवती आयुष्याचा प्रवास चालू असतो त्या भूकांवर स्वार होऊनच जगण येत आणि म्हणूनच आयुष्यात कांहीच साधू शकलो नाही ह्याची खंत उरते!

मंगळवार, एप्रिल ०८, २०१४

अस्वस्थ मनातील नोंदी … 2


धरलेली प्रत्येक वाट अनोळखीच असते. शोधून शोधूनहि ओळखीच्या खुणा कुठे सापडताच नाहीत. प्रत्येक झाड नवं, त्यावरच पान  नवं, त्यावरल फूल नवं, त्या फुलाचा गंध  नवा. पण ह्या नवीनतेन भारावून जाण्यापेक्षा गोंधळून जायलाच कां व्हावं ? अज्ञानात अंदाजाने बांधलेले आकार कुठेच दिसू नयेत म्हणून झालेली ही निराशा असते कि अपेक्षाभंगाची वेदना? कि स्वत:च्या अपेक्षांवाराच्या वाजवी विश्वासाची कणा ताठ असलेली जाणीव? त्यापोटी दूरात नजर रोवून असलेली आशा? उचललेल्या आपल्या पावलानाच अर्थ नाही कि पायाखालची वाटच अर्थशून्य आहे ? वळणा मागून वळण जाताहेत पण अजून "पुढे आलो"   ह्याची जाणीव कां होऊ नये ?प्रत्येक  वळणावर एक नवा दिशा निर्देशक, प्रत्येक  निर्देशकावर एका नव्या गावाचं नाव … साराच प्रवास असा अज्ञाताच्या पाठी आणि अखेर जाणवणार असेल त्या अज्ञाताची अतर्क्यता , नेणिवेच्याही  पलीकडील … अनाकलनीय ….
उध्वस्त क्षितीज आणि सूर्य दिशाहीन!

हे काय घडतंय? किंबहुना काहीच का घडत नाहीये? उतारावर ढकलून दिलेलं पिंप अजून थांबत नाहीये … पसरलेल्या धुक्यात एखादा आकार लपलेला आहे कि नाही? स्वत:ची स्थिती इतकी हास्यास्पद कधीच झाली नव्हती.
नोकरीच्या, कामाच्या ढालीने किती काळ निभाव लागणार?
पहाट किती लांब आहे? 

शनिवार, एप्रिल ०५, २०१४

अस्वस्थ मनातील नोंदी … १



मी अद्याप जिवंत कसा? कि नाहीच? ज्या तऱ्हेने दिवस जाताहेत त्या वरून काही अंदाज बांधताच येत  नाहीत. रस्त्यावर उभा असलेल्या रहदारी नियंत्रक शिपाया सारखा झालोय मी ! निर्देशित वाटेवरून सुसाट धावताहेत मोटार, स्कूटर, टांगे …. अन तो त्याच चौरस्त्यावर, त्याच  स्थितीत …. हात वेडे वाकडे करत , हे असं कां होतंय? ह्याच्या मागील संकेत काय?

ह्या बेकारीच्या आयुष्यात मनात सतत प्रश्नांच्या माशा घोंघावत असतात … हो, प्रश्न हे माश्यांसारखेच, सुखाला चिटकून बसतात, दु:खावर घोंघावतात …

प्रश्न उभा राहतो साऱ्या अस्तित्वाबद्दल , कुठल्या आशेवर माणूस जगात असतो? कुठल्या विचाराच्या बळावर अस्तित्व टिकून असते? अखेर अस्तित्वाची ओळख कुठली? जिवंतपणाची खूण  कुठली? …. अर्थशून्य श्वासांचा व्यापार? हृदयाचे निर्वात स्पंदन कि नदीचा बेताल ठेका? दर क्षणी सामोरी येणारी व्यक्ती मूकपणे डोळ्यातून प्रश्न विचारते, "तू जिवंत कां ?"  उत्तर - खुदा जाने ! त्या व्यक्तीला मीही विचारू लागतो "तू जिवंत कां ?" उत्तर - खुदा जाने!
खर तर जगात जगत कोण नाही? सारेच !! रोगी, जोगी, योगी, भोगी … ताठ, तुटलेले, उन्मळलेले….  सुखी, दु:खी, समाधानी … मोडलेले,जोडलेले, कोलमडलेले …. झाडून गेलेल्या बोटांचे महारोगीही जगात असतात एक स्पर्श- शून्य आयुष्य! गटारगंगेच्या काठी गलिच्छ झोपडीत जगत असतात भिकारी एक चेतनाशून्य आयुष्य ! सुखाची  सूज चढलेले श्रीमंत जगत असतात एक बुभुक्षित आयुष्य ! एक दोन सूर निखळूनही सारे गातच असतात एक बेसूर गीत जीवनाचे … ! कां ? काहीतरी मिटून गेलय, निसटून गेलंय,  मिटून गेलंय, संपून गेलंय ह्याची जाणीव असूनही, ठेवूनही प्रत्येकजण जगतच असतो एक प्रश्न खोल तळाशी दडवून …
प्रश्न :  मी जगतोय, मी जिवंत आहे, पण कां ???????
ह्या कां ला उत्तर नाही ……