रविवार, मार्च ०१, २०२०

प्रश्न नजरेचा होता ..

डोळ्यात कधी धुकं तर कधी कडा पाणावलेल्या. हे असं कविताबिविता वाचतानाच होत नाही, वर्तमानपत्र वाचताना सुद्धा होतं हे हिच्या लक्षात आलं. मी सांगत होतो दृष्टिकोन बदलून बघतो. पण ऐकेना. आताशा ही सुद्धा कातर होते, कात्रीत वगैरे धरत नाही. मग माझ्या कलाने  घेत म्हणाली "अहो, ते मेळाव्यात वगैरे जाता, चेहरे मोहरे नीट नकोत  का दिसायला ?"

मग गेलो डॉक्टर कडे. यंत्राच्या सहाय्याने डोळ्यांत डोळे घालून त्यांनी निदान केलं. "नजर स्वच्छ नाही !"  डॉक्टर बाईमाणूस ! नेमकं निदान केलं.  हे ऐकून हिचा चेहरा कसा झाला हे दिसलं नाही, हे एक बरं.
सारांशात, दोन्ही डोळ्यातली जळमटं काढली गेलीत.

सध्या दोन डोळे कामकाज  वाटून काम करताहेत. एकाने दूरदृष्टी घेतली तर दुसऱ्याने लघुदृष्टी ! ह्या लघु-गुरु दृष्टिकोनामुळे जगाची लगावली समजू उमजू लागेल अशी  आशा करायला  हरकत नाही.

सध्या डोळ्यांत तासातासाने अभिषेक  सुरु आहे, ६५ दिवसांचे व्रत संपले कि जगाकडे स्वच्छ नजरेने पहायला मोकळा ....
       
आता जरा थंडाईचा आस्वाद घेतो


शनिवार, फेब्रुवारी २९, २०२०

आळशीपणा : एक चिंतन

प्रत्येकाला आपण आळशी आहोत असे मनातल्या मनात वाटत असावे, सर्वसाधारण "तुमच्यातले एक वैगुण्य सांगा " असे विचारले तर कुणी " मी स्वार्थी आहे", "मी मत्सरी आहे" "मी धर्मांध  आहे" असे काही न  सांगता " मी आळशी आहे " असे सांगून गर्दीतला एक होऊन मोकळा होतो.
आळस हा तसा निरुपद्रवी अवगुण, तो शांत असतो मात्र अनेक वेळा दुसर्याला अशांत करतो कारण आपल्या आळसापायी दुसऱ्याचे काम अनेकवेळा अडून जाते.

मनात एक विचार आला, आपण आळशी आहोत असे जवळपास सर्वांनाच जाहीर करावेसे कां वाटत असावे? त्याने ते काय साध्य करतात? एक शक्य आहे अशी स्वीकृती दिली कि आपल्या अनेक वैगुण्यांना  समजून घ्यायला  समोरचा मोकळा असे मनात येत असेल. 

तसेही आपण आळशी आहोत असा आपला एक गैरसमज असतो, कारण लहानपणी  हे एक विशेषण आपल्याला त्या दोन ठिकाणी सतत लावले जाते, जिथे आपला दिवसाचा अधिक वेळ जातो - घरात आणि  शाळेत. उशिरा उठलात तर आळशी, हळू काम केलेत तर आळशी, विसावा घेतलात तर आळशी, बसून चिंतन करत असला तर आळशी. आंघोळ नाही केली तर आळशी आणि मग    " मी आळशी आहे" अशी  एक घट्ट स्व-प्रतिमा तयार  होते.

खरे तर कुणीही आळशी नसते. एखादे काम दुसर्या एका कामापेक्षा अधिक महत्वाचे वाटून ते मागे पडले तर त्या मागे पडलेल्या कामापुरते आणि वेळेपुरते आपण 'आळशी' असतो. हे नेमके असेच मांडले तर आपली प्रतिमा आपल्याच नजरेत थोडी उजळून निघते, कसनुसेपण कमी होते, आणि ओशाळलेपण कमी टोचते.

आळसाचे मूळ कारण दिशाहीन किंवा ध्येयहीनता असावे असेही वाटते. अशा स्थितीत उगाच आपण धावपळ करत असल्यासारखे दाखवतो, पण कां ह्याचे नेमके उत्तर आपल्याजवळ नसते. ही अशी दिशाहीन धावपळ मनात अर्थहीनता भरून ठेवेते, मरगळ आणते. कधी कधी ध्येयामध्ये सुस्पष्टता नसते. म्हणजे " मला काही तरी भरीव काम करायचे आहे" असे स्वप्न किंवा महत्वाकांक्षा असते पण भरीव म्हणजे नेमके काय हे सांगता येत नाही. 
  काही वेळा आपण आळस प्लॅन करतो. उद्या करावी लागणारी कामे आजच उरकून टाकतो. सकाळी मंडईत जाऊन आणावी लागणारी भाजी, आजच आणून ठेवतो. पहाटे फिरायला जात असू तर आज संध्याकाळीच फिरून येतो. हा प्लॅन्ड आळस एक वेगळा आनंद देतो. तो छान एन्जॉय करता येतो. 

"अहो, भाजी आणायला जातायना ना?" ह्या प्रश्नाला "कालच आणली" म्हणत फेसबुक मध्ये डोकं घालताना एक वेगळाच आनंद मिळतो. किंवा बिछान्यात अर्धा तास अधिक लोळताना मस्त गर्दभानंद घेता येतो.           

काही वेळा "मी आळशी नाही" असे सिद्ध करायला " मी कामात आहे" अशी जाहिरात करू लागतो. ह्यात उगाच संगणकावर सर्फिंग करणे आले, शिळे वर्तमानपत्र पुन्हा पुन्हा वाचणे आले, कुठलीही दिशा नसलेले "लिखाण" आले, काही तरी नवीन रचना करू असे म्हणत घरातली एक वस्तू दहा वेगवेगळ्या ठिकाणी लावून पाहत पुन्हा मूळ ठिकाणी ठेवणे आले,

पण आपण हे असे करत आहोत याची जाणीव होताक्षणीच ते काम सोडून थोडे चिंतन आवश्यक असते. मी नेमके काय टाळतोय याचा शोध घ्यावा लागतो. आणि तो लागतोच पट्कन. मग त्या टाळण्याचे कारण शोधून ते निवारण करावे लागते. म्हणजे जीवनाला थोडे अधिक सहज करता येते.

बुधवार, ऑक्टोबर ०२, २०१९

*पत्र्याच्या तळाशी सुकलेले सातवे पान *



अध:पतनाला फ़्रिक्शनलेस चाकं असली पाहिजेत. म्हणून त्याला टाळणंच  योग्य . एकदा का त्यावर पाऊल पडलं कि तोंडघशी पडणं  अटळ. 

स्वत: बद्दलचा आदर, आत्मविश्वास, मनाची दृढता ह्या साऱ्याची  परीक्षा त्या एका पावलावर अवलंबून असते. आदर्शवादाच्या चौकटीत सजून दिसणारे विचार विकारांच्या वावटळीत उध्वस्त होतात. उरते ती तूफान येउन गेल्यानंतरची भीषण विराणता … सारं  संपल्याची जाणीव …

विकारांच्या प्रवाहात वाहून जाणारे विचार पुन्हा किनाऱ्याला लागू शकणं  अशक्य, लागले तरी त्यांना मोडकळलेल्या होडीचच रूप उरतं . 

माणसाच्या मनात खोल दडून बसलेलं नेमकं असतं तरी काय? देवपण, माणूसपण कि हैवानपण ? मानव्याची जोपासलेली सारी फुलं विकाराच्या नुसत्या धगीन सुद्धा कोमेजून जातात. कमावलेली शक्ती, वाढवलेली बुद्धि, समजून घेतलेला विवेक, जोपासलेली मूल्य, सारं सारं नाहीस होत एका क्षणात ….

मग चिरंतन ते काय? जनावारपण ? खरा कोण? सैतान? ….वाचनातून, चिंतनातून, मननातून, 'तयार ' झालेलं मन खरच 'तयार' झालेलं असतं ? कि निव्वळ वरवरचा मुलामा म्हणूनच एका जनावरावर सभ्यतेचा माणसाचा दर्प येणारा मुखवटा चढवलेला असतो?

विकारापासून दूर पळणं  हे विकाराच्या आकर्षणाच्या भीतीपायीच स्विकारलेलं  असतं  ना ? कारण मुळातच जर अनाकर्षण असेल तर कुठलाही प्रयत्न न करता माणूस 'कोरडा' राहू शकतो.  उलट पळण  हे आकर्षणाची सुप्तावस्थेत वाढच करत असतं  आणि म्हणूनच पहिल्या पावलासरशीच जमीनदोस्त व्हायची वेळ येते.
आणि शुद्ध आल्यावर, आपल पळणं  ही सुटका नव्हती हे उमगल्यावर, आपल्या भोवतीचा पिंजरा हा बिनगजाचा होता हे दिसल्यावर जाणवतो तो पराभव ! पराभव स्वत:चा स्वत:कडून … ह्या प्रत दुसरे मरण नाही,  स्वत:च्या उध्वस्तपणास स्वत:च कारणीभूत होणं ह्या सारखी दारूणता नाही !!!

आणि इतकं सारं  होऊनही, आतून तुटून, मोडून, कोलमडून, उध्वस्त होऊनही इतरेजन जेंव्हा तुमच्या तेजोवलयित व्यक्तिमत्वाचा उदोउदो करतात तेंव्हा कोण कुणाची वंचना करतं, कोण फसवतं  आणि कोण फसतं   हा गोंधळच सुटत नाही.

ज्या वलयात, ज्या प्रभेत खोटेपणाला खरेपणा येतो, मृगजळातून तहान शमते, आकाश स्पर्श होते; त्या प्रभेसारखा, त्या तेजासारखा दुसरा अंधार नाही आणि त्या  खोटेपणाने,त्या मृगजळाने, त्या आकाशाने अनुभवलेल्या जिवंत मरणासारखे दुसरे मरण नाही !


माझ्या पराभवाचा सत्कार आज आहे,
येणार वेदनेला आकार आज आहे...    

आकाश जिंकल्याचा केला किती बहाणा,
कळले परि मनाला तो व्यर्थ माज आहे...

मृगजळात जल्लोषाच्या वाहून दूर गेलो,
पण मोल आसवांचे कळणार आज आहे...

त्यांना हवे म्हणुनी फाटून ओठ हासे,
ह्या बेगडी जिण्याचा फुटणार ताज आहे... 

मी जाहलो जगाचा, न राहिलो स्वत:चा, 
माझा फिरून मजला कळणार बाज आहे ... 

- श्रीधर जहागिरदार
१९७४

रविवार, सप्टेंबर २२, २०१९

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले सहावे पान*


ह्या जीवनातील नेमकी सत्य गोष्ट कुठली? भूक !!

नाना प्रकारच्या , विविध तऱ्हेच्या ... प्रकर्षानं जाणवणाऱ्या , अजिबात न जाणवणाऱ्या .... जागवणाऱ्या , निजवणाऱ्या ! ... आणि साऱ्या आयुष्याचा आकांत तेवढ्याचसाठी , तृप्तीसाठी . ह्या सत्यापायी माणसं खोट्यातली खोटी गोष्ट करतात , फसवतात, रडवतात, नागवतात ... फक्त तृप्तीसाठी.  साऱ्या भुकांचं मूळ दीड वितीची खळगी, तिचं रितेपण जाणवलं कि शरीरभर आणि मनभर भुकांचं एकछत्री साम्राज्य सुरु होतं.  पोट भरायला अन्न लागतं म्हणून अन्नाची भूक, अन्नासाठी पैसा  लागतो म्हणून पैशाची भूक, पैसा  मिळाला कि प्रतिष्ठा लाभते, प्रतिष्ठेची भूक ... अधिकाराची भूक , लौकिकाची भूक, प्रसिद्धीची भूक, एखाद्या अवलियास जाणवणारी  ज्ञानाची भूक, अहंकार-तुष्टीची  भूक. रात्री शरीर जाळून काढणारी दुसऱ्या शरीराची भूक ! 

एकदा भुकेच्या जाणिवेची ठिणगी मस्तकात पडली कि वणवा पेटल्या शिवाय राहत नाही. एखाद्या भुकेची तृप्ती झाली तरी ती तात्कालिक, क्षणिक, नश्वर ठरते. क्वचित प्रसंगी अपूर्ण ठरते . आणि मग लागते फरफटत नेणारी पूर्णत्वाची भूक. क्षुधापूर्तीच्या साधनांचं अपूर्णत्व उगाचच जाणवतं. पैसा मिळवण्याच्या वाटांचं एकदम दर्शन घडतं. मग प्रत्येक वाटेचा प्रवास. रात्रीच्या सुखात झिंग नव्हती म्हणून झिंगेचा शोध. लाभलेला लौकिक व्यापक नव्हता म्हणून व्यापकतेचा पाठपुरावा. गवसलेल्या ज्ञानाने उमगलेली अज्ञानता , त्यासाठी पूर्ण ज्ञानाचा हव्यास ....    
एकच मस्ती ... तृप्ती! एकच हव्यास....  पूर्णत्व ! एकच उद्देश ... संतुष्टी!

प्रत्येकाचं आयुष्य ह्याच भुकांनी भारलेले  .. तृप्तीच्या प्रेरणेने भारलेले ... पूर्णत्वाच्या सुरांनी नादावलेले ... म्हणूनच जीवनात एकच सत्य ... भूक ! गंमत ही कि ह्या सत्याच्या शोधापायी किंवा बोधापायी माणसाचे सारे आयुष्य खोटे होऊन जाते. फसवे ठरते .. पाखंड होते .. कुणी जगूच शकत नाही स्वत:चे आयुष्य, एक सच्चे आयुष्य . मनातील विचारांना, आवेगांना दडपत जो तो जपत जपत  जगत असतो. 

नांव, लौकिक, पैसे, कीर्ती, अधिकार, सभ्यता, नागरिकता ! संस्कृती नामक शहरातील हे रहिवासी आपल्या शहराचं शुभ्र, स्वच्छ, शुचिता नांव सांगून लगाम घालत असतात नैसर्गिक आवेगांना, प्रक्षोभांना, सहज उमटणाऱ्या विचारांना       



शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१९


इंदौरच्या ज्या घरात संपूर्ण लहानपण गेलं, म्हणजे १९७५ पर्यंतचा काळ, ते विकलं गेलं आणि काही दिवसांपूर्वीच पाडलं गेलं. घराचं वय नक्कीच ८०-८५ असणार.  त्या घराला ताळा लावून आई दादा जवळच असलेल्या फ्लॅट मध्ये रहायला गेले त्या नंतर म्हणजे २००४ नंतर मी त्या घरात पाय ठेवला नव्हता.

घरात वास्तव्य केलेल्या माणसांच्या आठवणी घराच्या भिंतीत जिरलेल्या असतात का? पावसाळ्यात घरात ताडताड पर्जन्य स्तोत्र म्हणत अभिषेक करणारे घराचे पत्रे पडताना विषण्ण झाले असतील ? काही पायऱ्या निखळलेल्या लाकडी जिन्याने सुटकेचा उसासा टाकला असेल का? देवघर असलेल्या खोलीतल्या कोपऱ्याने दोन बोटं चोखणाऱ्या श्रीची आठवण काढली असेल का?  दादांच्या ऑफिसच्या लादीला कोर्ट कज्ज्यांचा फोलपणा उमगला होता का? दाराशीच असलेल्या स्वयंपाक खोलीला शेवटची  साबुदाण्याची खिचडी  खावीशी वाटले असेल का? डॉक्टरच्या भीतीने ज्या फळीवर भाऊ चढून बसला होता त्या फळीने "तब्येत संभाळून रहा" असा निरोप भाऊ साठी ठेवला असेल का? घरातल्या तीन बालकनींनी शुभदाच्या गावगप्पा तिच्या मैत्रिणींसाठी आठवण म्हणून वाऱ्यासोबत धाडून दिल्या असतील का? मुकुंदने काढलेल्या चित्रांनी अनेक वर्ष शोभिवंत झालेल्या खोली खोलीतल्या भिंतींना ओकंबोकं झालं असेल का?
  
माझ्या अभ्यासाच्या खोलीच्या बिजागर सुटलेल्या खिडक्यांनी मी तिथे उभा राहून कुणा कुणाची वाट पहायचो ह्याची कागाळी केली असेल का?  
हे मनात साचत असताना आठवतात त्या  ३०-३५ वर्ष कुठलाही मेकअप न करू शकलेल्या घराच्या भिंती... एखाद्या जोगिणी सारख्या...   
**
इंदौरच्या ज्या घरात संपूर्ण लहानपण गेलं, म्हणजे १९७५ पर्यंतचा काळ, ते विकलं गेलं आणि काही दिवसांपूर्वीच पाडलं गेलं. घराचं वय नक्कीच ८०-८५ वर्षांचं असणार.  त्या घराला ताळा लावून आई दादा जवळच असलेल्या फ्लॅट मध्ये रहायला गेले त्या नंतर म्हणजे २००४ नंतर मी त्या घरात पाय ठेवला नव्हता. 
आम्ही राहायचो त्या दुमजली वाड्यात राहणारे सारेच भाडेकरू. आमच्या सहा खोल्यांचे भाडे महिन्याला रुपये २०. तळमजल्यावर राहणारे एक कुटुंब आपणच वाड्याचे मालक असे वागत असे . त्यांच्या तशा वागण्याचा कधी कधी त्रास होई. खूप राग यायचा.  मला सारखे वाटायचे वडिलांनी हा वाडाच विकत घ्यावा, आणि त्यांची गुर्मी काढावी. पण वडिलांनी तसे काही केले नाही. ते अखेर पर्यंत भाडेकरू म्हणूनच राहिले. वडिलांचे चुकलेच आणि त्यांना व्यवहार समजला नाही असे सारखे वाटत राहिले. ते सुद्धा चांगले वकील असताना ! 

पाचवीत शिष्यवृत्तीची परीक्षा दिली आणि शिष्यवृत्ती मिळाली. पहिल्या वर्षी २ रुपये महिना आणि पुढील दोन वर्ष ३ रुपये महिना ! थोडा अभिमान वाटायचा. नववी पासून पुढे कॉलेज पर्यंत मेरिट - कम - मीन्स शिष्यवृत्ती घेतली. वडिलांच्या सांगण्यावरून. अर्ज भरून प्रिन्सिपॉल कडे दिला कि बहुदा ऐकावं लागे -  जहागीरदार, वडील वकील असताना तुला कशाला हवी शिष्यवृत्ती? 'जहागीरदार वकील'  ह्या दुहेरी भारदस्तपणामुळे शाळेतल्या माझ्या मित्रांना तो वाडा आमच्या मालकीचा असावा असे वाटत असे. ते तसे नाही असे मी ओशाळून सांगत असे.

स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी वडील सरकारी नोकरीत होते. District Supply and Enforcement Officer ह्या पदावर. २००५ साली ते गेल्यावर त्यांचे सरकारी ओळखपत्र सापडले १९५२ सालचे. माझा जन्म १९५१ चा. मला ते आठवतात ते वकील म्हणूनच ... म्हणजेच आम्ही चार मुलं झाल्यावर त्यांनी सरकारी नोकरी सोडून वकिलीचा व्यवसाय सुरु केला. तोही सचोटीने. त्या काळात तसाही समाजाचा बहुतांश हा वंचितांचाच होता. "पुरवून पुरवून खा" असा कानमंत्र बालपणासून मिळालेला. बऱ्याच कुटुंबांनी देशाला जीवन समर्पित केलेले. नोकरी व्यवसाय सोडून स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरलेले. बरेच जण तुरुंगवास भोगून आलेले. आमचे वडील देखील स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते. असं कानावर पडलेलं.
   
   आता जाणवतं, नवख्या वकिलाला मिळत काय असणार ...  त्या पैशात संसार, चार मुलांचं शिक्षण ... कुठे कुठे काटकसर केली असेल त्यांनी !!  कशा ठरवल्या असतील आयुष्यातल्या प्राथमिकता? अर्थातच मुलांचं भविष्य ही आई-वडिलांची प्राथमिकता असतेच. ते बऱ्याच गोष्टींचा त्याग करतात, छंद, मौज मजा, रजा, प्रवास ....    

त्यांचं एक वाक्य सारखं आठवतं "वकिली म्हणजे प्रतिष्ठेने उपाशी जगायचा  व्यवसाय" . आणि मी त्यांना व्यवहार कळला नाही म्हणून माझं मत बनवून मोकळा !! 

वर्तमानाच्या भिंगातून भूतकाळ बघताना परिपक्वता लागते, हेच खरं.  नाही तर मनात अढी ठेऊन "आपण तेवढे शहाणे " ह्या गुर्मीत अनेक जण जगताना आढळतात.  

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले पाचवे पान*


*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले पाचवे पान*

संस्कृती ह्या राजमान्य अधिकाऱ्याच्या दराऱ्यात  माणूस दडपून टाकतो आपली सहज,  स्वाभाविक, नैसर्गिक भूक.

खर तर आदि कालात संस्कृती नामक  शब्द योजण्यात आला तो संतुष्टी, तृप्ती , सहज -साध्य, आकारबद्ध प्रवासाने मिळालेली व्हावी म्हणून. संस्कृतीपूर्व काळात, जाणवलेल्या भुका एकमेकांच्या मदतीने भागवल्या जाव्या, त्या पुर्तीला एक रूप असावे, एक गंध असावा, त्या तुष्टीला एक रंग असावा, म्हणून सभ्यता, संस्कृती, आचार, ह्या शब्दांची निर्मिती झाली. आपली प्रत्येक कृती, प्रवासातला हर एक टप्पा माणूस ह्या कसोट्यांवर घासून पाहू लागला. नव्या वाटा, नवे मार्ग आखले गेले. नव्या अनुभवांचा अनुनुभूत आनंद मिळाल्याने संस्कृतीचा सत्कार झाला, आचारांचा आदर झाला. सभ्यतेला मान मिळाला. त्या सर्व भुका, त्या सर्व ओढी ह्या वाटांनी परिपूर्ण झाल्याही असतील. परंतु आज?

जुन्या, बुरसट आणि गंजलेल्या मुल्यांभोवतीच आमचा पिंगा चालू असतो आणि जीवन हे अतर्क्य, निरर्थक आणि गोंधळलेले वाटू लागते. ज्या भूकांभोवती आयुष्याचा प्रवास चालू असतो त्या भूकांवर स्वार  होऊनच जगणं  येतं  आणि म्हणूनच आयुष्यात कांहीच साधू शकलो नाही ह्याची खंत उरते!

मेंदूवर सांचलेली वाळवंट
पसरताहेत हळूहळू मनापर्यंत ...

किती काळ जपशील चार थेंब
भावनांचे, ओसाड रेताडास फुटलाच, तर
फुटेल कोंब निवडुंगाचा अन
तुझ्या आत्म्याची लक्तरं
फडकावतील तुझ्या अपयशाची गाथा ...

पण ह्याची शक्यताही कमीच !
कारण कुठल्याही गाथेचा नायक
होण्याइतका मोठा नाहीस तू ...
ह्या वैराणात तुझी नियती शहामृगाची!

वादळाच्या वासाने खुपसून घे मान
तुलाच गिळणाऱ्या  वाळवंटात,
तुझ्या अस्थिंचेही होऊ देत वाळू कण
अन जा सामावून ह्या वाळवंटात
त्याचाच एक भाग होउन !

- श्रीधर जहागिरदार 

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले चौथे पान*



कधी कधी वाटतं मरून जावं ... अगदी सहजपणे हा विचार येतो . कां?
रात्रीच्या शांततेत छातीवर छत पेलत जेंव्हा विचारांचे घोडे उधळतात तेंव्हा ते आपलेल्या ट्रॅक पासून कितीही दूर गेले तरी रोख ह्या एकाच विचाराकडे जातो . कां? 
एखादं जालीम विष पाण्याबरोबर पोटात ढकलावं असं वाटतं. कां?
त्या महाशिवाचा अजिंक्य त्रिशूळ छातीवर पेलावा असंही वाटतं . कां?  . 
रात्रीचीच गोष्ट कां, भर दिवसा  समोरून धडधडत येणाऱ्या ट्रक समोर सायकल उभी करावी हाही विचार येतो. कां? 
मृत्यूकडे जाण्याची ओढ लागली म्हणून? जीवनापासून निराश झालो म्हणून? करण्यासारखं काहीच नाही ही जाणीव झाली म्हणून? कि सतत आपल्या भोवती आपला वास हुंगत "तो " वावरतोय , फक्त निर्धारित सामानाची वाट पहात, ही जाणीव आहे म्हणून? 
उभं राहण्याआधीच कोसळण्याची ही हौस कां? तुटत चाललोय मी! अवतीभवती गर्दी असूनही एकटा होत चाललोय मी. ... कां ? कसा? 
हंबरडा फोडावा म्हटलं तर श्वास गुदमरतो ... डोळा पाणी आणावं म्हटलं तर डोळे नुसतेच चुरचुरतात. ती नेमकी कुठली वाफ आंत दडून नुसती  होरपळून काढतेय? तो नेमका कशाचा शोध आहे ज्या साठी सारं चैतन्य , सारा उत्साह, सारी उमेद ताटकळतेय उंबरठ्यात?
किती दारं ठोठावली पण हवी असलेली हाक अजून कानी पडत नाहीये. किती वाद्यांच्या तारा छेडल्या पण हवा तो सूर जुळत नाही . कुठल्या दिशेतून येणार आहे  तो भारावून टाकणारा सुगंध? दिशा बदलली तरी आकाश तेच हा दारुण अनुभव नुसता भटक्या बनवून सोडणार ... शिवाय माथ्यावरलं वंचनेचं ओझं वाढतच जाणार ..... 

हुकल्या कितीक वाटा, चुकली जरी दिशाही,
आकाश तेच आहे, तोवर न खंत काही !
हातात कोरलेल्या, आहेत दग्ध ज्वाला,
मी सूर्य रे अनादी, कां बाळगू तमा ही?
घायाळ मोर नादी झाला जरी खुशाल
जो पेटला पिसारा, विझणार ना कधीही!
झोकात झोकले मी जहराळ प्राक्तनाला,
फुटणार कांच प्याला, समजून काय नाही?
चुकतील सूर थोड़े, गळतील पाकळ्याही,
गाण्यात या जिण्याचा शोधून गंध पाही!