बुधवार, नोव्हेंबर २८, २०१८

काबुल भेट - दुसरा दिवस


कुठल्याही नवीन घटनेला सामोरे जाताना मनाने त्या बद्दल आपसूकच एक चित्र तयार केलेले असते. ते अर्थातच त्या सारखाच एखादा पूर्वानुभव, किंवा तो नसल्यास ऐकलेल्या, वाचलेल्या माहितीवरून तयार झालेले असते. ही एक पूर्वतयारी असते, नव्या अनुभवाला सामोरे जायची.  ते चित्र कधी वास्तवाशी बरचसं जुळतं, कधी वास्तव एखादा सुखद धक्का देतं तर कधी निराशा. मात्र हा नवा अनुभव घेताना आणि घेतल्यावर चिंतन केलं तर मन अधिक संवेदनशील व्हायला मदत होते.              

अफगाण म्हणजे पठाण आणि पठाण म्हणजे उंचेपुरे, दणकट, देखणे. डोक्यावर अफगाणी फेटा बांधलेले असे इथल्या पुरुषांबद्दल तर स्त्रिया म्हणजे बुरखा घातलेल्या, क्वचितच दृष्टीस पडणारे त्यांचे चेहरे म्हणजे मस्तानीच्या रूपाशी स्पर्धा करणारे असे मला वाटत होते. बँकेत काम करणाऱ्या अशाच पठाणांना प्रशिक्षित करायचे आहे म्हणजे एका वेगळ्याच आव्हानाला सामोरे जायचे आहे असे मुंबईपासून मला वाटत होते. बँकेत शिरल्यावर मात्र वेगळीच माणसं भेटली. होते सारेच अफगाणी, मात्र याह्याच्या उंचीशी स्पर्धा करणारं कुणीच नव्हतं. सारेच साधारण भारतीय उंचीचे. एक दोघे तर माझ्या सारखे शिडशिडीत. एकेकाशी ओळख होत गेली. वागण्यात अतिशय सुसंस्कृत, चांगले इंग्रजी बोलणारे आणि फॉर्मल ड्रेस मध्ये. अर्थात बहुराष्ट्रीय बँकेतल्या स्टाफ कडून ग्रूमिंग ची जी अपेक्षा असते ती  पूर्ण करणारे. सारे २५-३० वर्षाच्या आसपासचे. अपवाद एका जुनिअर ऑफिसरचा. तो गृहस्थ ४०-४५ वर्षांचा असावा.  एक स्थानिक महिला अधिकारी देखील होती. बुरख्यात नसली तरी अंगावरच्या शालीने डोके झाकलेली. शाखेत सारेच 'अधिकारी' वर्गात मोडणारे. क्लार्क कुणीच नाही. एकूण १२ स्टाफ होता. दुसऱ्यांदा २००७ साली गेलो तेंव्हा हे मनुष्य बळ जवळ जवळ दुप्पट झालेलं  होते. त्यात पाच महिला होत्या.    


स्टाफ मधील बहुतेक सारेच घरून आपल्या कारने बँकेत येणारे. आणि त्या गाड्या मोठ्या, SUV सारख्या. म्हणजे तसे सधन.अशीच एक गाडी घेऊन येणाऱ्या एका स्टाफ ची उंची जेमतेम ५ फूट!  काही लोकांचे शिक्षण दुबईत, काहींचे पाकिस्तानात तर एक दोघे थेट इंग्लंड मध्ये शिकलेले. रशिया आणि तालिबान राजवटीत ज्यांना शक्य होते असे काही नागरिक परदेशी पलायन करून गेलेले. तिथे त्यांनी नोकऱ्या मिळवल्या आणि इथे आपल्या घरी पैसे पाठवू शकण्या इतके पैसे कमवू लागले.

३५% बेरोजगारी असलेला हा देश आहे. ज्या मध्यम वयीन ऑफिसर चा मी वर उल्लेख केला, तो आधी अफगाणिस्थानच्या मध्यवर्ती बँकेत जनरल मॅनेजर पदावर होता, हा सात मुलांचा बाप ती नोकरी सोडून  बहुराष्ट्रीय बँकेत ज्युनिअर ऑफिसर म्हणून रुजू झालेला.  सरकारी नोकऱ्यांमध्ये पगार किती कमी असावा ह्याचा अंदाज आला. वर्षानुवर्षे युद्धाच्या खाईत लोटला गेलेल्या देशाची आर्थिक कोंडी कशी होते ह्याच हे दारुण वास्तव. ह्या देशाचं लाईफ एक्सपेक्टन्सी २००५ साली अवघ ४२ वर्षे  होतं. त्याचं कारण देखील युद्धस्थिती आणि दहशतवाद !

तरुण स्टाफ एकमेकांशी अफगाणी भाषेत बोलत, ते कळत नसे. मात्र हे बोलणं खेळीमेळीचं असणार हे जाणवलं. ओमर नांवाचा एक शांत ऑफिसर फॉरेन एक्सचेंज सांभाळायचा. स्वभावानं गंभीर, शिकण्याचा खूप उत्साह असलेला, हुशार माणूस. पुढे तो वर्षभर भारतातल्या शाखेत काम करायला आला, शिकण्याचा एक भाग म्हणून. ह्या साऱ्या स्टाफचा एक म्होरक्या होता, झिया. तो माझ्या दिमतीला दिल्यासारखा वागत होता. मला काय हवं काय नको हे अधून मधून विचारत होता.  कुठल्याही गटाच्या चाणाक्ष म्होरक्याचं वागणं असावं तसच. महिला अधिकाऱ्याच्या वागण्यात संकोच नव्हता. सर्वांच्याच वागण्यात एक प्रामाणिक आदबशीरपणा होता. ह्या सगळ्यांकडून मी त्यांच्या कामाचं स्वरूप समजून घेत होतो. नॉलेज गॅप काय आहे ह्याचा अंदाज घेत होतो.

बँकेचे रोकड व्यवहार 'अफगाणी' आणि अमेरिकन डॉलर ह्या दोन्हीत चालत. मात्र अफगाणीतला  व्यवहार नाममात्र वाटला. बँकेत येणारे अधिकांश ग्राहक हे परदेशी वकिलातीतले किंवा अमेरिकन लष्करातले.  मी माझ्या जवळचे काही डॉलर अफगाणित बदलून घेतले, बाजारात काही खरेदी करायला लागतील म्हणून.  जोसेफ ने माझ्यासाठी लंच मागवला - अफगाणी रोटी आणि छोले. रोटी अफगाणी लोकांसारखीच मृदू ! लंच नंतर थोडा बाहेर पडलो. एका  वकिलातीच्या बाहेर काही शीख मंडळी ताटकळत होती. ती भारतीय वकिलात होती. हे शीख इथले नागरिक, बहुदा व्हिसाच्या कामासाठी आले असावेत.  चार पावलांवर एक छोटी टपरी दिसली. गेलो तिथे. एक सिगरेटच पाकीट घेतलं. पैसे किती विचारले तर त्याने  १ डॉलर सांगितले. मी उडालोच ! मला वाटलं तो अफगाणी चलनात सांगेल. आमचा संवाद हिंदीत झाला. हिंदी सिनेमा आणि गाणी इथे भलतीच लोकप्रिय आहेत ह्याचा प्रत्यय आला. मी माझ्या जवळचे अफगानी त्याच्या पुढे केले, त्याने पन्नास अफगानी काढून घेतले. एक गोष्ट लक्षात आली डॉलरची किंमत भारतीय रुपयात आणि अफगानीत जवळपास सारखीच आणि इथे डॉलरच्या व्यवहारावर कुठलेही बंधन नाही असे दिसले.  तशीही देशाची इकॉनॉमी अमेरिकन मदतीवर भिस्त ठेऊन. अगदी छोटा दुकानदार सुद्धा डॉलर घेऊन वस्तू विकतो, किंबहुना त्याला ते अधिक फायद्याचे असते!

आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने बँकेत काम जास्त होते. आधी ठरल्या प्रमाणे आज दोन तास आणि शुक्रवारी पूर्ण दिवस आणि त्या नंतर रोज संध्याकाळी २ तास अशी प्रशिक्षणाची वेळ ठरली होती. मात्र आज २ तास मिळणे कठीण होते. प्रशिक्षण बँकेचे व्यवहार चालत त्याच हॉल (?) मध्ये होणार होते.  दिवस मावळायच्या आत स्टाफला घरी पोहोचायला हवे होते. जोसेफ ने मला अडचण सांगितली. मी समजून घेतली. त्याने मला तू निघ गाडीने, आम्ही येतो मागून असा सल्ला दिला. मी परतलो. सोबत सावली सारखा याह्या होताच. मला सोडून तो परत गेला.

वेळ असूनसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने मला एकट्याला कुठे फिरायला मनाई होती.  घरी परतलो आणि टीव्ही वर हिंदी सिनेमा पाहत बसलो !
(क्रमश:)

      


बँकेबाहेरील बंकर


बाजार 

                             


                








शनिवार, नोव्हेंबर २४, २०१८

काबूल भेट - आगमन


Everything happens for a reason. हा एक विश्वास आहे, ही एक धारणा आहे. अडथळे पार करत आयुष्याला पुढे नेण्यासाठी तर कधी जीवनाचे नेमकेपणे समजून घेण्यासाठी ही एक प्रेरणा आहे. 
माझ्या आतील प्रेरक बलस्थानं आणि वैशिष्ट्य जाणून घ्यायला मी अनेक वर्षांपूर्वी CliftonStrengths assessment टेस्ट घेतली होती. त्यानुसार connectedness हे  माझं  सर्वात जोरकस बलस्थान आहे. ह्याचा अर्थ " घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक कारण असते कारण ह्या विश्वातल्या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्यात" हा मनातला दृढ विचार. त्यामुळे प्रत्येक स्थिती समजून घेताना नकळत ह्या भिंगाचा उपयोग माझ्याकडून केला जात असतो.


हे सारं मनात यायचं कारण काल अचानक काही फोटो हातात आले, अफगाणिस्तान भेटीचे.   लहानपणी "घर कोंबडा" असलेला मी नोकरी करायला घरच नाही तर गाव सोडले. ह्याचा अर्थ माझ्या मूळगावी इंदौरमध्ये मला नोकरी मिळत नव्हती असा नाही, आलेल्या नोकऱ्या मी काही ना काही कारणाने नाकारल्या होत्या. मात्र नोकरीला लागल्यावर अनेक गावं पालथी घातली आणि काही वेळा परदेशातसुद्धा जाऊन आलो. मी कधी परदेशी जाईन असे स्वप्न बघितले नव्हते. प्रवास घडलेल्या देशातील  एक देश अफ़गाणिस्तान. २००५ ते २००९ ह्या चार वर्षात मी तीन वेळा काबूलला गेलो. 

काय कारण असेल माझ्या ह्या तीन भेटींमागचे? नेमके कारण मला अद्याप उमगलेले नाही. अनेक दशकांपासून युद्धाच्या धगीत होरपळत असलेला हा देश. अनेक शासकांच्या हत्या किंवा त्यांचे देशातून पलायन ह्या देशाने म्हणजेच इथल्या प्रजेने पाहिलेले आहे. आधुनिक काळात जगातील महाशक्तींनी - रशिया आणि अमेरिका - आपल्या सत्ता खेळात वापरून घेतलेला हा देश. एकेकाळी बुद्धाच्या अहिंसा आणि शांतीचा प्रभाव अनुभवलेला हा देश आता तालिबानी दहशतवादाच्या छायेत आता जगतो आहे. रशियन राजवटीतून ह्या देशाला मुक्त करायला अमेरिकेनेच तालिबान्यांना छुपा पाठींबा दिला होता हे सुद्धा लक्षात ठेवायला हवे.        

अगदी लहान असताना बलराज सहानीच्या "काबुलीवाल्याने" ह्या देशाची तोंड ओळख करून दिलेली. मग महाभारतातील हाच तो गांधार देश हे समजले. मग शकुनी मामा आठवला, गांधारी आठवली.  

जगात युद्ध आणि शांती हे सतत आपला प्रभाव टाकत असतात मात्र कुणी एक कायम स्वरूपी नांदत नाही. शांतीच्या पोटात युद्धखोरी आणि युद्धाच्या मस्तकावर शांती असे जगाचे एक चित्र मला सतत दिसत असते. 

माझ्या पहिल्या भेटीच्या काळात (जुलै २००५) तालिबान्यांच्या पाशवी राजवटीतून मुक्त करायला अमेरिकी सेनेने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता, तालिबानी काबूलमधून हुसकावले गेले होते. 

२० जुलैला सकाळी एअर इंडिया च्या विमानाने दिल्लीहून निघून काबुल विमानतळावर उतरलो. आता इथे एक आठवडा मुक्काम होता, कारण दिल्ली काबुल दिल्ली ही फ्लाईट आठवड्यातून एक दिवस होती.  विमानतळाच्या इमारतीत पायी पायी चालत पोहोचलो. सामानाची वाट पाहताना लक्षात आले इथे कन्व्हेयर बेल्ट नाही. इमारतीच्या भिंतीला एक मोठे भगदाड होते आणि त्यातून प्रवाशांच्या बॅगा शकुनी मामाने त्वेषाने फासे फेकावे तशा आत फेकल्या जात होत्या. मला न्यायला बँकेचा एक भारतीय अधिकारी, चार्ल्सटन, आलेला होता. तरुण माणूस, मुबंईत बोरिवलीत त्याचे घर. आम्ही बाहेर आलो तर एक उंचा पुरा दणकट पठाण पुढे आला, त्याने माझी बॅग हातात घेतली. चार्ल्सटन ने त्याच्याशी ओळख करून दिली. तो बँकेत ड्राइवर, मोठ्या साहेबांची सुरक्षा सावली वगैरे अनेक कामं करणारा एक विश्वासू कर्मचारी होता, याह्या खान.      तिथून आम्ही चालत पार्किंग पर्यंत आलो आणि मग कार मधून रहाण्याच्या ठिकाणी निघालो. मला वातावरणात एक प्रकारचे भकासपण जाणवत होते. रस्त्यांवर वर्दळ अशी नव्हतीच. धूळ मात्र भरपूर.  दुतर्फा विरळ वस्तीची घरे होती. काही इमारती स्पष्टपणे बॉम्ब हल्ला किंवा मिसाईल हल्ल्यात उध्वस्त झालेल्या होत्या. त्यातल्या बचावलेल्या भागात एखादे कुटुंब तग धरून रहात असावे. 
      
मुक्कामाची जागा म्हणजे एका अतिसुरक्षा भागात एक दुमजली बंगला. चौफेर उंच भिंत, एक सुरक्षा दार, नेहमी बंद असणारे. आत मशिनगन घेतलेले सुरक्षा कर्मी. ते दाराला असलेल्या छोट्या खिडकीतून पाहून मग दार उघडणार. आत आलो आणि बंगल्याचे प्रशस्तपण जाणवले. तळमजल्यावर एक मोठ्ठा दिवाणखाना आणि किचन. मागच्या अंगाला एक प्रशस्त बगीचा. तो मात्र ओकाबोका. कारण विचारता कळले, आता कुठे बर्फ पडायचे दिवस संपलेत आता बाग फुलेल. वरच्या मजल्यावर रहायच्या खोल्या. तिथे बँकेचा मुख्य अधिकारी - जोसेफ सिल्व्हेनस - तोही भारतीय, चार्ल्सटन आणि माझ्या सारखा अधून मधून येणारा पाहुणा अशा तीन माणसांच्या  सोयीसाठी तीन खोल्या. मला "फ्रेश व्हा, जेऊन आराम करा मग संध्याकाळी भेटू बोलू" असे सांगून तो बँकेत गेला. जाण्याआधी किचन सांभाळणाऱ्या अफ़गाणी बाईला जेवण्याच्या सूचना द्यायला आणि मला एकटे कुठे बाहेर जाऊ नका अशी सूचना द्यायला तो विसरला नाही. बाई मोडकं तोडकं इंग्रजी बोलून घेत होती. तालिबान्यांच्या प्रभावातून देश मोकळा होत असल्याचे लक्षात आले.                   

संध्याकाळी सहाच्या सुमाराला बँकेचा सुरक्षा सल्लागार आला. त्याने मला इथल्या मुक्कामात काय करायचे आणि काय नाही ह्याच्या सूचना दिल्या. एकटे फिरू नका, कार मधून फिरताना काचा बंद ठेवा वगैरे वगैरे. सर्व सूचना सांगून झाल्यावर त्याने मला सूचना असलेला कागद दिला आणि सर्व सूचना समजल्या अशा अर्थाच्या डिक्लेरेशन वर माझी सही घेतली.  बँकेच्या गाड्या बुलेट प्रूफ होत्या. जोसेफची  आणि माझी आधीपासून ओळख होती. खरे तर त्यानेच मला बँकेतल्या स्टाफला ट्रेनिंग देण्यासाठी बोलावून घेतले होते.  त्याने मला " श्रीधर, डोन्ट बी स्केअर्ड. धिस इस ए नाईस प्लेस अँड पिपल आर नाईस अल्सो " असा दिलासा दिला. त्याच्या बरोबर याह्या खान आणि एकजण आले होते. स्वयंपाक करणारी बाई चार वाजताच परतली होती.   खरे तर मी घाबरत आलो नव्हतोच. जिथे चार माणसे रहातात तिथे घाबरायला काय कारण? अर्थात सावधपणे राहणे हे तर जगात सर्व दूर करावेच लागते. जेवण झाल्यावर आम्ही मागच्या बागेत खुर्च्या टाकून सिगरेट ओढत बसलो. मिट्ट अंधार होता, आणि निरव शांतता. व्हरांड्यातला एक  बारका दिवा तेवढा लागलेला होता.  अचानक वर आकाशातून जोरात घरघर ऐकू आली. जोसेफने सांगितले ही अमेरिकन लष्कराची हेलिकॉप्टर्स, गस्तीवर आहेत. दुसऱ्या दिवसापासून मला कामाला लागायचे होते. गुरुवारी अर्धा दिवस आणि शुक्रवारी सुटी असल्याने पूर्ण दिवस ट्रेनिंग होते. मी म्हटले " जोसेफ मी तुझ्याबरोबर सकाळीच येईन. स्टाफ शी ओळख होईल आणि इथल्या कामाचे स्वरूप समजेल.  

घर सफाई, कपडे धुणे ही कामे सुद्धा ती अफगाणी स्त्रीच करायची. ती आठ वाजता आली.  नाश्ता तिनेच बनवला होता - आम्लेट सँडविच.सकाळी लौकर तयार होऊन, नाश्ता करून आम्ही निघालो. गाडीतून  बँक साधारण   २ किलोमीटर अंतरावर होती , अति सुरक्षा भागात. त्या भागात परदेशी वकिलाती होत्या. बँकेसमोर बंकर होते. गेटपाशी मशिनगन धरून सुरक्षाकर्मी. आत जाणाऱ्या प्रत्येकाची आणि त्यांच्या बॅगेची तपासणी होई, ह्यातून जोसेफची सुद्धा सुटका नव्हती! 

(क्रमश:)
             

           

रविवार, नोव्हेंबर १८, २०१८

भक्तिभाव



बेगडी भक्तिभावाने साखर झोपेचा खून करून
हिवाळी कोवळ्या उन्हात शांत पहुडलेल्या कर्ण्यांवर
शिटताहेत कबुतरे आणि काही कावळे;
पोपट, चिमण्या बागडताहेत हिरव्या अंगाखांद्यांवर
कुजबुजताहेत रशरशीत जीवन गाणी सुखदायी काकड वेळेपासुन ....
ह्यातले तुझ्यापर्यंत काय पोहचत असते रे?


खूप आकर्षक आहेत यंदाचे दिवाळी अंक. बाजारात केळी घेताना, गाडी मागच्या दुकानांत मांडलेले दिसले. बाजार थैली जड होण्याआधी थोडी #मौज करावी म्हणून गाडी पलीकडे गेलो. सर्व अंकांवरुन नजर फिरवली, किंमतीतलं वैविध्य उठून दिसलं. महिन्याच्या महिन्याला वर्तमान पत्राची रद्दी देत असल्याने प्रत्येक अंकाच्या वजनाचा अंदाज पटकन घेता आला. #सुगंधचा अंक हातात घेतला तर हाताला धूळ लागली. मग लक्षात आलं, धूळ साऱ्याच अंकांचं परिक्षण करत असल्यासारखी पसरली होती. तशीही #दीपावली सरली होती. मी #आवाज न करता पुढे निघालो. घरात भाजी नव्हती. भाजीच्या दुकानासमोर आलो. साऱ्या भाज्यांचा एकच भाव. पाणी मारून फ्रेश ठेवलेल्या. दूधी प्लास्टिक वेष्टनात. दोन दिवसांची भाजी घेऊन घरी परतलो.
हिनं अचानक विचारलं, यंदा तुम्ही दिवाळी अंक नाही घेतलात? नाही घेतला. इंटरनेटवर मिळतं वाचायला... अंक घेतला की आवरुन ठेवायचा मोह होतो, आणि त्यावर धूळ साचत रहाते...


- श्रीधर जहागिरदार 
१८-११-२०१८

गेला बाजार - १



गेला बाजार - १ 


मोबाईलची रिंग वाजली. अनलिस्टेड नंबर. पण कॉल घेतला. कधीतरी मनोरंजन होतं. 

"अरे मी प्र प्र , ओळखलस ना?"
मी पटकन मुखवटा चढवला, आव आणला. " अरे SSS  आज कशी आठवण ?" मी मेंदू झटकायला सुरुवात केली.

" अरे नुकताच ".....आणि काशिनाथ"  बघितला, मुलांबरोबर.  साल्या, तुझी आठवण आली. त्यातून आमच्या मेडिकलच्या बॅचचं गेट टुगेदर होतं, तिथे जाऊन आलो.  तिथे काही कॉमन मित्र भेटले, म्हटलं मुंबईला गेल्या गेल्या तुला फोन लावायचा." 

आता मेंदू स्थिर झाला. ओळख पटली. सत्तरचं दशक आठवलं. बरीच नाटकं आठवली, मंचावरची, विंगेतली, तालमीतली.
खरं तर दोघ इतकी वर्ष मुंबईत आहोत, तो ७४ सालापासून, मी ९१ सालापासून. दरम्यान मुंबईत प्रत्यक्ष भेट एकदाच, १२ वर्षांपूर्वी त्याच्या क्लिनिक मध्ये. मात्र काही मैत्र वेगळ्याच धाग्यात गुंफलेले असतात. 
" मग, कधी भेटतोस ? आज? उद्या? माझ्या घरी की तुझ्या घरी?" गडी भेटायला  चांगलाच उतावीळ झालेला वाटला. 
" अरे यार, त्या तीन महिन्यात तुझा खांदा खूप वापरलाय मी." तो बोलायचं थांबवत नव्हता. त्याने असं बोलल्यावर मलाही त्याचं एक हळवं नाटक आठवून गेलं. 

तो काळ माझ्या बेकारीचा होता, मित्रांना फुकटचे सल्ले द्यायला भरपूर वेळ होता. संध्याकाळी गांधी पुतळा किंवा टिळक पुतळ्यापर्यंत फिरायला मी कुणी तरी मित्र शोधत असे. ( नेहरू पुतळा आणि सरदार पटेल पुतळा बऱ्याच नंतर झालेले, तेही गजबजलेल्या रस्त्यांवर) हाही त्यातलाच एक. गम्मत ही, ह्यातला कुणीही माझा वर्ग मित्र नसायचा. 
        
" खूप वेगळे वेगळे सर्कल होते तुझे. नाटकवाले, कवितावाले, फिलॉसॉफिकल (?)." गडी फुर्सतीत  होता.
मी म्हटलं " नक्की भेटू. पुढच्या आठवड्यात. पण संध्याकाळी चालेल ?" 
"अरे हो, चालेल. मी हल्ली संध्याकाळचं क्लिनिक बंद ठेवतो. "
" नक्की कळवतो." 

फोन बंद केल्यावर आठवलं, हा मुंबईत ७४ साली आला, इथेच लग्न केलं. त्या वर्षी मी TIFR ला माझा एक प्रोजेक्ट करायला २ महिने आलो होतो.  ह्याच्या घरी ह्याला भेटलो होतो. एका रविवारी सकाळी. त्याने आपल्या मिनी बार मधून काढून मला रेड वाईन ऑफर केली होती ... आणि मी घेतली होती !! तो मिनी बार अजून मनात घर करून आहे.  

माणसानं आपल्या नौकेचं वल्ह काढून ठेवलं कि त्याला गेल्या बाजारचं काय काय आठवतं !! आणि ती मोरपिसं तो मोकळ्या मनाने, नि:संगपणे मनभर फिरवून घेतो!     

सोमवार, ऑक्टोबर २२, २०१८

गाठोडे - पुरचुंडी सणवारांची


गाठोडे - पुरचुंडी सणवारांची

आज शरद पौर्णिमा. लक्ष्मी पूजनाचा दिवस. मी असे म्हटले तर काही लोक "मसाला दूधात काय भांग वगैरे टाकली का?" असा प्रश्न विचारू शकतात. एकूणच माणूस आपला तोच अनुभव खरा, आपला तोच विश्वास सत्य, आपण तेव्हढे महाज्ञानी ह्या भूमिकेतून फटकन निर्णय देऊन मोकळे होतात. काही वेगळ्या शक्यता असू शकतात ही लवचिकता क्वचितच बघायला मिळते. आज देशातला एक मोठा भूभाग कोजागिरी पौर्णिमा वर्षा ऋतूची समाप्ती आणि शरद ऋतूचे आगमन म्हणून चांदणीय रात्री मसाला दूधाचा आनंद घेतो. तर बंगाल, ओरिसा आसाम ह्या पूर्व भागात आजच्या रात्री लक्ष्मी पूजन होते. ज्या कार्तिकी अमावस्येला - दिवाळीला आपण लक्ष्मी पूजन करतो त्या दिवशी पूर्व भारतातले निवासी काली पूजन करतात.

अमावस्या हा दिवस बहुतेक लोक अशुभ मानतात, दिवाळी हा अपवाद ! अमावास्येला कुठलंही नवे  काम करू नये  असा एक संकेत पाळला जातो. १९९० साली चंद्रशेखर अचानक भारताचे पंतप्रधान होऊ घातले. मी त्यावेळी चेन्नईला रहात होतो. ते पदाची शपथ कधी घेतील याचा कयास बांधताना नागराजन हा सहकारी म्हणाला  " ऑफकोर्स ऑन न्यू मून डे." चंद्रशेखर हे बिहारी आहेत आणि त्यांच्या दृष्टीने अमावस्या  शुभ असू शकत नाही अशी शंका देखील त्याला आली नाही.              

दिवाळी सणाच्या अनेक कथा प्रचलित आहेत आणि त्यानुसार सण साजरा करायची पद्धत वेगवेगळी असेल वेगवेगळ्या भागात, मात्र तो साजरा संपूर्ण देशात होतो. असे सर्वच सणांचे नाही. राखी आणि होळी हे सण दक्षिणेत साजरे होताना मी बघितले नाहीत. चेन्नईतल्या सावकारपेठेत मात्र हे सण साजरे होत, कारण तिथली मारवाडी वस्ती. ज्या उत्साही वातावरणात महाराष्ट्र, गुजराथ येथे गणेशोत्सव साजरा होतो तसा  इतरत्र होत नाही. उत्तर भारतात तर गणेश चतुर्थीची सुट्टी देखील नसते. कुठल्या प्रदेशात कुठल्या सणाचे महत्व ह्या साठी त्या त्या प्रदेशातील बँक हॉलीडेस ची लिस्ट पहावी.

इंदूर मधील सणांची मजा आणखीन निराळी. होळकरांमुळे ह्या शहरावर महाराष्ट्रीय संस्कृतीचा प्रभाव बरीच वर्षे टिकला. त्यामुळे गुडीपाडव्याला घराघरांवर  उभारलेल्या गुढ्या मोजायला आम्ही निघत असू. स्नेहलतागंज, रामबाग, नारायणबाग, इमलीबाजार, नंदलालपूरा ह्या मराठी वस्तीतून फिरलो कि २००-३०० गुढ्या सहज मोजता येत. श्रावण मासी हर्ष मानसी येत असे तो सणांची रेलचेल असते म्हणूनच. मला आठवतंय, शाळांमध्ये श्रावणी सोमवार आणि शनिवार अर्धा दिवस सुटी असे , संध्याकाळी उपवास सोडायचा म्हणून. जन्माष्टमी देखील घरोघरी साजरी होई . फुलांची झकास आरास वगैरे करून लंगडा बाळकृष्ण आरामात लाड पुरवून घ्यायचा . आरास करायला फुले, पाने आमच्या मामाच्या "गुलशन नर्सरी'तून  आणायची. तळमजल्यावर राहणारे दद्दाजी (ठाकूर) हा सण जोरात साजरा करत. त्यांचा मोठा मुलगा - लल्लू भैया बाळाच्या रडण्याचा ट्या हा आवाज झकास काढे.                      
श्रावण सुरु होता होता गणेशोत्सवाची तयारी सुरु होई ती म्हणजे उत्सवाचे मंडळ निवडून  नाटक कुठले बसवायचे हे ठरवण्यापासून ...

               

रविवार, ऑक्टोबर १४, २०१८

गाठोडे - पुरचुंडी दुसरी

गाठोडे - पुरचुंडी दुसरी

२०१० साली नोकरीच्या चाकोरीतून सुटका झाली, ३५ वर्षांचा पसारा बाहेर निघाला. अनेक गोष्टी. त्या आवरता आवरता कागदाच्या सहाणेवर शब्द उगाळायला पुन्हा सुरुवात झाली.  
"प्रत्येक वस्तूभोवती गुंता पागल भावनांचा, आणि 
इतिहास घडल्या, बिघडल्या आणि अवघडल्या क्षणांचा
झरझर सरकतो डोळ्यांपुढून"

हा जो आपला इतिहास असतो तो दोन प्रकारचा, एक इतरांना दिसणारा घटनात्मक आणि एक आपल्याला आणि फक्त आपल्याला ठाऊक असलेला भावनात्मक. हा इतिहास घडण्यात आपली खाजगी वाचन संस्कृती एक भूमिका बजावते तसाच आपल्या संपर्कात येणाऱ्या माणसांचा, मित्रांचाही  एक सहभाग असतो.

माझे पहिले मित्र अर्थातच इंदूरच्या ज्या वाड्यात मी माझ्या आठवणीतली पहिली २४ वर्ष काढली त्या वाड्यातले. हा दुमजली बंगलीवजा वाडा, मागे औटहाऊस, पुढे खेळायला आंगण, समोर एक मोकळी जागा आणि लाकडं कोळशाची टाळ (वखार), डावी उजवीकडे असे आणखी दोन बंगले. गल्लीच्या कोपऱ्यावर घडीवाली मशीद - हा आमचा लँड मार्क ! डावी उजवीकडचे बंगले स्वतंत्र मालकीचे. आमच्या वाड्यात वरती तीन, खालती तीन आणि औटहाऊस मध्ये चार अशी भाड्याने राहणारी १० कुटुंब. आम्ही वरच्या अर्ध्या मजल्याचे जहागिरदार. उरलेल्या अर्ध्या भागात दोन बंगाली कुटुंब. तळमजल्यावर आमच्या खालच्या अर्ध्या भागाचे ठाकूर एक हिंदी भाषी कुटुंब आणि अर्ध्या भागात दोन मराठी कुटुंब. औटहाऊस मध्ये तीन मराठी आणि एक माळवी कुटुंब. आमच्या बाजुच्या स्वतंत्र बंगल्यात एक सिंधी कुटुंब.  एकुणात बहुभाषी परिसर.  दुसऱ्या भाषा शिकायचं आणि त्या समजून घ्यायचं बाळकडू इथेच मिळालं. "आयकोम बायकोम तडातोडी, जोदूर मास्टर  शोसूर बाडी" हे बंगाली बडबडगीत मी सुबु - देबू बरोबर शिकलो. ह्या तोडक्या मोडक्या बंगालीमुळे मला पुढे कलकत्त्यात ट्रैनिंग वर्कशॉप करायला गेलो कि रॅपो बिल्ड करायला सोपे जात असे. "आमी बांगला बुझते पारी, बोलते पारी ना" असं सुरुवातीलाच सांगायचं आणि सुटायचं.         

मात्र एका बाबतीत आमचं घर एकदम अल्पसंख्य. आम्हाला सोडून इतर सारे रविवारी " आज काय स्पेशल"  चा शो चालवणारे. त्यामुळे बहुरंगी बहुढंगी वास घ्यायला नाक लौकर शिकले,जीभ मात्र ह्या बाबतीत एकदम ढ ! तिला वळणावर आणायला मला लखनऊ, लुधियाना ह्या शहरांचा काही काळ पाहुणचार घ्यावा लागला. अर्थात ह्या मांसाहारी आहाराने अंगावर काही विशेष मांस चढलं नाही त्यामुळे ते त्यागलं.      
वाड्यातल्या मित्रांशी खेळताना भांडण झालं की माझा किंवा भावाचा उद्धार "कढी भाऊ" असा होई.  'कढी भाऊ'  हे इंदूरातील मराठी माणसांना खाली दाखवण्याचे उदबोधन, जसे मुबंईत "भैया" हे उत्तर भारतीयाना कमी लेखायचे ! काही दिवस मी खेळातून वगळला जाई. मी त्यामुळे कसनुसा होई. घराच्या गॅलरीतून किंवा खिडकीतून त्यांचा खेळ पहात राही. पुस्तक वाचत बसे. मी लहानपणी तसा अशक्तच होतो. त्याचं कारण मला आईचे दूध मिळू शकले नाही. अर्थात ही सगळी ऐकीव माहिती. त्यामुळे शाळेत सुद्धा उशिराच जाऊ लागलो. डॉक्टरांनी दुधातून अंड खाऊ घाला असा सल्ला दिला. आई वडिलांसाठी हे कठीण काम. मुळात आपल्या ब्राह्मण्याचा त्यांना - विशेषतः वडिलांना अभिमान. तो ते इतरांना बोलून सुद्धा दाखवत, अगदी इतरांच्या अभक्ष्य (?) खाण्याला कमी लेखत. आता आपल्या शेंडेफळाला सशक्त करायचं तर हे अंडी आणण्यापासून ते फोडून दुधात घोळवून देण्यापर्यंत काम वडिलांना करावं लागणार होतं. त्यांनी ते केलं. आम्हाला एक सांगितलं "कुणाला सांगू नका हे खाता म्हणून, औषध आहे हे !" तेच एक अंड  घेऊन यायचे, आईने ठरवून दिलेल्या एका ठरलेल्या ग्लासात फोडायचे, दूध टाकून फेटायचे आणि मला नाक बंद करून पी असं सांगायचे. एक समजलं, खाण्यापिण्यात पाप - पुण्य असं काही नसतं. मात्र आता माझ्या जवळ "कढी भाऊ" चा डाग धुऊन काढायचा साबण हाती लागला. आमच्या वाड्यात एक ब्रेड विकणारा येत असे. ठाकूर साहेब त्याचे नियमित गिऱ्हाईक. इतर मंडळी देखील घेत. मला दूध ब्रेड आवडत असे. मग कधी तरी छोटी ब्रेड विकत घ्यायला २५ पैसे मिळत. एकदा खिडकीतून खाली आलेला ब्रेड वाला पाहिला आणि आईकडून २५ पैसे घेण्यात यशस्वी झालो. लाकडी जिना धावत उतरून पुढील अंगणात आलो. ठाकूर साहेबांच्या मोठ्या ब्रेडचे सुरीने स्लाईस कापण्यात येत होते. मी वाट पाहत उभा राहिलो. ठाकूर साहेब माझ्याशी गप्पा मारत, माझी गंमत सुद्धा करत. त्यांना पत्ते - ब्रिज - खेळायला आवडे. ते पुढच्या अंगणात खुर्च्या टेबल मांडून आपल्या पार्टनर्स ची वाट पहात बसत. त्यांनीच मला सात हात हा खेळ खेळायला शिकवले. मला त्यांनी विचारले , " अरे श्री, तुम इस ब्रेड का क्या करोगे? आम्लेट तो तुम खाते नही. तुम तो कढी भाऊ हो".  पायरीवर बसलेला त्यांचा धाकटा मुलगा कुत्सितपणे हसला. मी बोलून गेलो " मैं रोज दूध के साथ अंडा खाता हूं, आज ब्रेड खाऊंगा !!!"  मी खसा खसा साबण घासून "कढी भाऊ" हा डाग धुऊन काढला. संध्याकाळी कोर्टातून वडील परतले , गेटपाशी सायकल वरून उतरले आणि वाड्यात शिरले. ठाकूर साहेबांनी लगेच "जागीरदार साहब आज तो आपकी पोल खुल गई !!" असं म्हणत त्यांना श्रीचा अंडे का फंडा सांगून टाकला ! पुढे काय झालं ते सांगण्यात काही अर्थ नाही. वडील मला मारत नसत पण .... पुढे कुणी माझ्या शेजारी बसून आम्लेट खाल्लं तरी मला उलटीची भावना होत असे. ह्या भावनेवर मी विजय मिळवलाच. ते पुन्हा कधी, ओघाओघाने.                                          

विचारी मनाला  जगण्यासाठी  सूत्र सापडली . एक, कुणाच्या वेगळेपणाला उपहासाचा विषय बनवू नाही. वेगळेपण हे वगळण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी असतं. पुढे वेगवेगळ्या प्रदेशात रहाताना हे सूत्र फार कामी आलं. आपल्या देशाचा विस्तार आणि वैविध्य पहाता देशातील छोट्या शहरात राहणाऱ्या सामान्य माणसांना ह्याची जाणीवच नाही. उ.प्र. मधील नेपाळ लगत असलेल्या लखीमपूर (खिरी) गांवात दोन वर्ष रहात असताना शेजारी राहणाऱ्या बायका स्वातीला "मतलब आप मद्रासी है " असे म्हणत. त्यांना हिंदी पंजाबी सोडून दुसऱ्या भाषांची फार थोडी माहिती होती. 
दुसरं अधिक महत्वाचं सूत्र आयुष्यात लपवण्या सारखं काही करू नाही आणि जे करता ते लपवू नाही. लाज आणि अपराध-भाव सांभाळण्यात फार ऊर्जा वाया जाते.  

गाठोडे - पुरचुंडी पहिली

गाठोडे - पुरचुंडी पहिली

एकेकाळी माझे बऱ्यापैकी वाचन होते. आसपासची प्रेमळ मंडळी त्याचे "आवड" म्हणून कौतुक करायची. त्या काळात टी व्ही नव्हता, घरातला एकमेव रेडिओ आमच्यापासून चार हात उंचीवर ठेवलेला असायचा. त्यातून तो देवकीनंदन पांडे हिंदी बातम्या आणि सुरजित सेन इंग्रजी बातम्या द्यायचे. मर्दानी खेळात होऊ शकणाऱ्या दुखापतींना मी घाबरायचो. आजच्या सारखे अभ्यासाला जुंपायचे अत्याचार पालक मंडळी मुलांवर करत नसत. ओळखीचे शिक्षक असलेल्या शाळेत एकदा दाखला झाला की पालकांची जबाबदारी संपायची. "जहागिरदार वकिलांचा मुलगा ना तू ?" हे वाक्य महिन्यात एकदा ऐकवून शिक्षक माझ्यावर धाक ठेऊन असायचे. अशा एकंदर वातावरणांत कसे कुणास ठाऊक छापील अक्षरे मला आकर्षित करायची. अक्षर ओळख घरातच झालेली. माझ्याहून सुमारे दोन वर्ष मोठ्या असणाऱ्या भावाची शाळेची पुस्तके मी वाचत असे. माझ्या वाचनात आलेली पहिली कविता "यु यु यु यु पपी पपी, खेळू आपण लपाछीपी"
महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर येथील कार्यकारिणीत वडील सक्रिय होते. ते तिथल्या पुस्तकालयातून आम्हा भावंडांसाठी गोष्टीची पुस्तके वाचायला आणत. सिंदबाद, गलीवर, तीन शिलेदार, गोट्या, हेमा आणि सात बुटके असेच भेटलेले.
मी पाच सहा वर्षांचा असताना वडिलांनी सरकारी नोकरी सोडली आणि वकिली सुरु केली. दोन तीन वर्षातच त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरु केली आणि ऑफिस घरातच ठेवलं. त्यामुळे आपसुकच आम्ही कुठल्याही अधोगतीपासून वाचलो हे नक्की. वय वाढत गेलं आणि मग किशोर, इंद्रजाल कॉमिक्स हे घरी रतीब टाकू लागले. वाचन संस्कृती वाढीला लागली. वय वाढलं आणि मग ना. सी. फडके, भाऊ पाध्ये, दळवी, यांना घरात यायची परवानगी मिळाली. वाचता वाचता वाचा फुटली मग वेगवेगळ्या विषयांवरच गंभीर वाचन सुरु झालं. सत्यकथेत गटांगळ्या खाल्ल्या. पिपांत उंदीर नेमके कशाने मेले ह्याचा सौंदर्यशास्त्रीय शोध घेऊन पाहिला. ओशोंचे 'संभोग से समाधी की ओर ' घरी आणून वाचले आणि वडिलांना वाचायला दिले ! थोडक्यात इतर गोष्टींप्रमाणे वाचनात सुद्धा माझ्यावर वडिलांनी कुठलेही सोवळे ओवळे थोपले नाही.
अशातच इंग्रजी पुस्तके वाचावी असे वाटून गेले. अर्थात माझे इंग्रजी विज्ञानलेले. त्यामुळे ते Thou, Thee, Thy, Thine and Ye मला न पेलवणारे. इंग्रजी अभिनव साहित्य हा विषय मी आजपर्यंत गुगलून देखील काढलेला नाही ! इंग्रजी चित्रपटांमुळे काही पुस्तके वाचाविशी वाटली त्यातले माझी वाचन प्रतिष्ठा वाढवणारे Gone With The Wind हे एकमेव पुस्तक.
अशातच मला पुस्तकांची एक भली मोठी लॉटरी लागली. माझा चित्रकार, मूर्तिकार आणि आर्किटेक्ट भाऊ मुंबईला शिकायला आला. पार्ल्यात कुणीतरी रूमपार्टनर शोधून तो रहात असे. एका पार्टनर जवळ पुस्तकांचं कलेक्शन होतं. तो काही कारणाने ते काढून टाकणार होता.
बंधूंनी ते सुमारे ५० पुस्तकांचं कलेक्शन १०० रुपयात विकत घेऊन पुढील सुट्टीत इंदूरला येताना मला भेट दिलं. त्यातून बाहेर पडले अॅलिस्टर मॅकलीन, इर्विन स्टोन, गुरुनाथ धुरी चे ग्लोरिया , पुशिंची सावित्री, हेरॉल्ड रॉबिन्स, इरविंग वॉल्लेस, इयान फ्लेमिंग, स्पर्शाची पालवी ..... ह्या पुस्तकांनी माझ्यासोबत सुमारे वीस वर्ष उत्तर दक्षिण प्रवास केला. त्यांत भर पडत गेली. बरीचशी पुस्तके खिळखिळी होऊन निसटून गेली, काही वाटून झाली. काही येणार असे सांगून गेली पण वाट चुकली. मला त्याची खंत नाही. ती त्यांचं देणं देऊन गेली.
आज हे सारं आठवायचं कारण १२ ऑक्टोबर. मला वाचायला मदत करणाऱ्या ह्या दोन्ही व्यक्तींच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस. आज बंधूंचा जन्म दिवस आणि आमच्या वडिलांचा स्मृती दिवस.

गाठोडे

 

आयुष्याची ६ दशके पूर्ण झाली कि खुंटीवर टांगून ठेवलेले गाठोडे खाली घ्यायला हरकत नसते कारण आता त्यात भरण्यासारखे काही नसते. साधारण २१,६०० वेगवेगळ्या रंगीबेरंगी पुरचुंड्या त्यात कोंबलेल्या असतात. त्या पुरचुंड्या आता पुन्हा नजरेखालून घालायला जीव कासावीस होतो. हातात येईल ती पुडी उघडायची. आणि जमेल तितके त्रयस्थ होऊन त्यात जपून ठेवलेल्या भावनेला सामोरे जायचे. कधी कासावीस व्हायचे, कधी हसून मान झटकायची, कधी आत असलेली जळमटे झटकून टाकायची. बघू या किती पुरचुंड्या उघडल्या जातात  ...


पाण्यात वाहत्या, पाय आता 
सावरायचे सांग काय आता 
गाठोडे झाले रिते, तर बरेच आहे 
वाहील वस्त्र मलीन, बरेच आहे ....