बुधवार, नोव्हेंबर २५, २०१५

Honesty comes for a price


Honesty comes for a price
********************
And then suddenly he shouted " that's enough ! If you think so, you may leave the house"
She appeared shocked. She took some time to regain her composure. She politely asked "what exactly has disturbed you?"
" Nothing" he fumed.
"I am sure, something that I said must have ! Please tell me, did I say something the way you have not taught me"
" ....... "
" Tell me please, you have always encouraged me to be open and honest and frank. And now you are not frank."
"it's OK"
" Please, please tell me ... " she said with tears in her eyes. She realized, she has hurt him. " You love me naa? Tell me, what has hurt you, I will not say that again.. "
" .... You know .. I just realized, it is easy to expect honest views from your dependents. But when they are honest, it hits hard, real hard"
She hugged him. Sobbing she said " I will not hurt you any more, I love you"
" No, be courageous to be honest with your feelings. Express them. That will help me to be brave" he said patting her head.
She looked at him. He was not sure if she trusted him, nor was she !!
Both realised one thing for sure. Honesty comes for a price !!

रिक्षा - एक अनुभव



डॉक्टर कडून घरी येताना , बायकोला म्हटले तुला घरी सोडतो आणि मी केमिस्ट कडून औषध घेऊन येतो. घरी पोचलो, रिक्षावाल्याला पैसे दिले आणि मी पुढे चालू लागलो. चार पावले पुढे गेलो तो मागून रिक्षावाला आला म्हणाला " आगे जाना है, बैठिये साब छोड देता हूँ " म्हटले " अरे, बस यही नुक्कड़ तक जाना है" . " मैं भी उस तरफ जा रहा हूँ, बैठिये" . बसलो.   त्याने सोडले केमिस्ट पाशी !!
मग्रूर रिक्षावाल्यांनी गजबजलेल्या रस्त्यावर असे एक दोनच  भले रिक्षावाले भेटले कि माझा रिक्षावाला ह्या संस्थेवरचा विश्वास पुनर्स्थापित होतो आणि मी बाहेर जायला निघालो कि "रिक्षाsss" अशी  प्रेमळ हाक मारून माझ्या संयमाची परीक्षा देतच राहतो.  

२५-११-२०१५
संध्या. ७.१० 

रविवार, ऑक्टोबर ०४, २०१५

मी - एक शोध


मी ज्या गोष्टींना मानतो त्यातील अधिकांश ह्या ऐकीव, गावगप्पा किंवा तोडून मोडून सांगितलेल्या गोष्टींवर आधारित असतात.
वस्तुस्थिती समोर यायला वर्षे लागतात.
वास्तव हे  सतत उधाणत असते, शांत जलाशयासारखी स्थिर नसते. क्षणा क्षणाला उसळणाऱ्या लाटांनी गोंधळून जाणाऱ्या सागराचा अशांत पृष्ठभाग कधीच पारदर्शी नसतो, वास्तवतेत दडलेले गूढ आशय आपण सूर मारून शोधून काढावे लागतात,काही काळ तिथे रमून.
अनुभवांच्या उडालेल्या धुराळ्यातून महत्वाचे आशय खाली बसायला वेळेला वेळ द्यावाच लागतो. आपल्या आयुष्याचा संपूर्ण अर्थ आपल्याला आपल्या जीवनात मिळणारच नसतो. तेंव्हा स्वत:वरच नसते कडक ताशेरे ओढायचे कारण नाही.
माझा भूतकाळ मला संपूर्णपणे कधीच कळणार नसतो, कारण आठवणी ह्या तशाही तुटक आणि त्रोटक असतात.
माझे बालपण, तिथे जाणवलेले नागवलेपण आणि निरागस आनंद , झालेल्या फसगती आणि वचनपूर्ती, हे सारे मी माझ्या गरजांच्या सदोष नजरेतून पाहिलेले असते.
मी जाणीवपूर्वक निवडलेल्या वेचक घटना आणि जाणीवपूर्वक दडवलेल्या गोष्टी ह्यांच्या सहाय्याने आज मी माझा इतिहास रचलेला आहे.
मला आठवत असलेली माहिती जरी धूसर असली तरी ती माझ्या अवशेष वृत्तीत किंवा दडून असलेल्या भयात सामावलेली असते. आणि मी अनुभवलेले सारे काही माझ्या वागण्या बोलण्यातून दिसून येते.
मी म्हणजे हे लहान मोठे अनुभव, जे माझ्या स्वभावात, व्यक्तीमत्वात आणि अस्तित्वात जपून ठेवलेले असतात.
माझ्या पूर्वायुष्यातला काही भाग माझ्यावर सतत आघात करतच राहतो.
निरागसपणाच्या स्वप्नातून बाहेर पडून माझा इतिहास मला आठवायलाच हवा. ह्या जगाला, जगण्याला मी कसे रंगवतो आहे हे मी ओळखायलाच हवे.
आपल्या भूतकाळाला खुल्या मनाने सामोरे जाणे म्हणजेच खरे स्वातंत्र्य !!

रविवार, जुलै २६, २०१५

शक्यता


अधून मधून
मी माणूस असल्याची शक्यता
मलाच माझी जाणवत असते
म्हणून / म्हणजे  मी अजून
जिवंत आहे …
भक्ष्य झालेलो नाही
माझ्यातील
हिंस्त्र श्वापदाचा … 


(ही केवळ एक शक्यता !
कळवावे मला, जर
तुम्हाला जाणवले अन्यथा !)

शुक्रवार, जुलै १७, २०१५

दोन काठ


नाकारताना ठाऊक असतं
असलेली पोकळी रितीच असणार
पुढेही;
पण "असेल अजून चांगले"
ह्या आशेचे स्पंदन चालू ठेवतात शोध …
एका क्षणी स्वीकारतोच आपण
मिळते ते,वाटते
भरली आता पोकळी … पण
पुढच्याच क्षणी ग्रासते भीती
'अजून चांगल्याची' वाट बंद झाल्याने
थांबलेल्या प्रवासाची !!
.
.
आशा आणि भीती
दोन काठाच्या मधला
हा खळखळाट …।

गुरुवार, जुलै १६, २०१५

दोष, टीका आणि मी


स्वत:तच आत बघत असताना काही जागा पाहण्यात मी अपेशी ठरतो. त्या शोधून काढण्याचे दोनच प्रमुख मार्ग आहेत. एक म्हणजे दुसऱ्यांच्या त्या गुणाची पावती देण आणि कौतुक करण जे माझ्यात नसल्याने मला छळत असतात. दुसरा, मी वापरलेले ते वाग्बाण ओळखण जे मी स्वत:चा बचाव करताना वापरतो.
इतर लोकांच्या वागण्यातील नेमके काय मला आंदोलित करते हे जाणून घेण्यासाठी मला माझ्या अलीकडच्या "सामन्या"चे पुनरावलोकन करायला हवे, पण माझ्या बचावात्मक पवित्र्यामुळे हे ओळखून काढणे त्रासाचे जाते. माझ्या वागण्यातील काही लक्षणांवरून मला ह्यांची चांगली ओळख पटू शकते. जसे
  • टीकेला मी पटकन उत्तर देतो, बऱ्याच वेळ आणि सविस्तर बोलण्याची मला गरज वाटू लागते आणि मधेच कुणी अडवल्यास मी अस्वस्थ होऊ लागतो
  • मी खुलासा देऊ लागतो, मी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो पण मी जिंकतोय अस वाटत असतानाही मला कुंठीत होत असल्यासारख वाटू लागत, जणू काही गमवायच ते मी गमावूनच बसलोय
  • मी भरभर विचार करू लागतो आणि थबकण्यास आतूनच प्रचंड विरोध जाणवू लागतो, जणू काय आता थांबलो तर फार मोठे नुकसान होईल
  •  माझा चेहरा जड, तणावपूर्ण आणि गंभीर भासू लागतो
  • समोरच्याची टिप्पणी ऐकल्याबरोबर मी नजर टाळतो
ती टिप्पणी मला गंभीरपणे घेण्याशिवाय अन्य प्रकारे घेताच येत नाही, शब्द मला कधीच हसण्यावारी नेण्यासारखे किंवा फालतू वाटत नाहीत. जेंव्हा उपस्थितांना माझी प्रतिक्रिया दिसून येते तेंव्हा बहुतेक वेळा ते परिस्थितीस हसण्यावारी नेतात. मला मात्र मी गैर रीतीने समजला गेलेलो किंवा वापरला गेल्यासारखा वाटू लागतो
*******
आता हे जाणवतंय कि दुसऱ्यांवर टीका करत असताना मी माझेच दोष पाहत असतो. मला माझी टीका अधिक प्रामाणिक, नेमकी आणि विशिष्ट करायला हवी. म्हणजे मला नेमके काय आवडत नाही, पटत नाही, हे सांगायला हवे. दुसऱ्यांमध्ये एखादा दोष कसा कार्यरत असतो हे व्यवस्थित कळल्यावर मी माझ्या स्वत:च्या वागण्याकडे नव्या आणि नवलाईच्या स्पष्टतेने पाहू शकतो. (टीकेची ही तऱ्हा मी मूकपणे टीका करत असताना उत्तमरीतीने काम करते)

******
स्वत:चा बचाव करायला तेंव्हा मला फारच आवडत जेंव्हा मला माझ्या बचावात्मक पवित्र्याची आणि वागण्याची जाणीव असते आणि तरीही मी जेव्हढा हवा तेव्हढा बचाव करण सुरूच ठेवतो.

*******
कुणीही चूक नसतो. असलाच तर कुणी अजाण असू शकतो. जर मला वाटत कि एखादी व्यक्ती चूक आहे तर एक मला तरी कशाची तरी जाणीव नसावी किंवा त्या व्यक्तीला तरी. तेंव्हा, जर मला प्रभुत्व स्थापन करण्याचा खेळ खेळायचा नसेल तर हे शोधण उत्तम कि ती व्यक्ती काय बघतेय आणि हे तेंव्हाच समजेल जेंव्हा मी ते विचारेन !

******
" तू चूक आहेस " चा अर्थ " मला तुझ समजत नाहीये " ____ "तू जे पाहतो आहेस ते मी पाहत नाहीये; पण तुझ्यात काही चूक नाहीये, तू काही मी नाहीस आणि तसे असण्यात जराही चूक नाही"

******
मला मी प्रत्येकापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ, उत्कृष्ट किंव निकृष्ट, वरचढ किंवा कमी, बरा किंवा खराब वाटत असतो. श्रेष्ठत्वाचे क्षण फुशारण्याचे असतात पण फार थोडे समाधानचे क्षण असतात जेंव्हा मी इतरांच्या बरोबरीचा वाटतो.

********
व्यक्तींच्या जगतात 'श्रेष्ठ' नांवाची चीजच नाही !!

*********
ही अशी विभागणी करून, वर्गीकरण करून नव्याने झालेल्या ओळखींना व्यवस्थित बासनात बांधण्याची गरज कां असावी? जिवंत मानवी व्यक्तीसारख्या गुंतागुंतीच्या गोष्टीला वर्गीकृत करण्याचा माझा प्रयत्न माझा उथळपणाच दाखवतो. दुसऱ्या व्यक्तीबद्दलचा निर्णय म्हणजे असे चित्र ज्यात असंबद्ध गुण जोडलेले असतात,मात्र त्या व्यक्तीचा वेगळेपणा निसटून गेलेला असतो. असे कुणा माणसाला वर्गीकृत करणे म्हणजे त्याचे वस्तूकरण करणे !! दुसऱ्या माणसाशी कनेक्ट व्हायला मला त्या माणसाचा अनुभवच घ्यायला हवा, निव्वळ विचार करून चालणार नसत !!
(अनुवादित)

सोमवार, जून २२, २०१५

सहज आठवले म्हणून … कप्पा -१


कप्पा -१ 
वाचनाची सवय लहानपणीच लागली. अगदी सकाळी सकाळी येणारे वर्तमानपत्र वाचायला मला चौथ्या पाचव्या यत्तेपासून आवडे. आणि हे घरात सगळ्यांच्या बाबतीत होते. बातम्या हा दादांचा (आमच्या वडिलांचा) जोपासलेला छंद. सकाळच्या ६ वाजेपासून रात्रीच्या ११ वाजेपर्यंतच्या बातम्या ते कान देऊन ऐकत आणि त्यावेळी कुणी दंगा केलेला त्यांना खपत नसे. त्यामुळे अशोक बाजपाई आणि देवकीनंदन पांडे हे आमच्या घरातलेच होऊन गेले होते.
पाचवीत  असतानाची एक आठवण मनात कायम राहिली आहे. सकाळचा पेपर कुणी आधी वाचायचा ह्यावरून माझ्यात आणि मोठ्या बहिणीत थोडे भांडण झाले आणि पेपर खेचाखेचीत फाटला. हा फाटलेला पेपर पाहून दादांचा संताप होणार हे कळल आणि माझी घाबरगुंडी उडाली. आता आपले कान तरी लांब होणार नाहीतर गाल लाल होणार हे लक्षात येउन त्या दिवशी मी शाळा १० वाजतानाची असताना ९ वाजताच धूम पळालो. न जेवण, न डब्बा !
कधी नव्हे ते शाळेत सगळ्यात आधी पोहोचणारा मीच. टंगळ मंगळ करून वेळ काढला. एकतर मी शामळू मुलगा. दांडगाई. दंगा, खेळ ह्या पासून थोडा दूर राहणारा. प्रार्थना झाली, वर्ग सुरु झाला आणि थोड्याच वेळात पाहिले  तर वर्गाच्या दारात काळ्या कोटातले दादा !!!!
दादांचा कोर्टात जाण्याचा रस्ता आमच्या नाईक मास्तरांच्या शाळेवरून जात असे. ते दादांच्या ओळखीचे. त्यांच्या ऑफिस शेजारी आमचा वर्ग. आमचे शिक्षक मुंगी मास्तर. ते सुद्धा दादांच्या ओळखीचे. दादांना पाहून माझी ताराम्बळ उडाली. आता सर्वांसमोर आपली निघणार हे नक्की वाटले. दादांनी सरांना सांगून मला बाहेर बोलावले. काही खाल्लस का विचारले. खाण्याचा प्रश्नच नव्हता, कारण शाळेतून निघताना चार आणे सुद्धा खिशात नसायचे, ती पद्धतच नव्हती. ते मला घेऊन शाळेच्या बाहेर आले. समोरच्या ठेल्यावर नेउन चार केळी घेतली आणि मला खायला लावली. काही झाल तरी घरातून उपाशी निघायचं नाही ह्यापुढे अस बजावून सांगितलं, मला वर्गा  पर्यंत सोडलं आणि कोर्टाला गेले.
आमच्या वाढत्या वयात त्या त्या स्टेजला येऊ शकणारे अनुभव आधीच अंदाज बांधून त्या विषयी मोकळेपणाने बोलणारे दादा 'बाप' कसा असावा ह्याचे देखील संस्कार मनावर घडवत होते.
सहज आठवले म्हणून …

शनिवार, एप्रिल ११, २०१५

शांत आकाश आणि निवांत हिरवळ


आज सकाळी फोन आला तेंव्हा तो मोनलने  घेतला, मी कुठेसा होतो. तिने निरोप दिला. आणि माझ्या तोंडून "ओह नो " ज्या पद्धतीने निघाले त्यावरून तिच्या लक्षात आले कि मला खूप खोलवर दु:ख झाले आहे. तिने थोडा वेळ जाऊ दिला, मला सावरू दिले आणि विचारले "  कोण होत्या त्या?"
खरच … कोण होत्या त्या (माझ्या) ? आम्हा साऱ्या, सांस्कृतिक कार्यक्रमातून उत्साहाने वावरणाऱ्या, (त्या काळच्या) तरुण मंडळींच्या ढवळीकर काकू. मात्र माझ्यासाठी त्या ह्या संबोधनाच्याही वरच्या होत्या. म्हणून माझ्या तोंडून निघाले. " माझी सांस्कृतिक आई" !  हे मात्र मुलीच्या डोक्यावरून गेले. माझी मुलगी त्यांना कधी भेटलेली नाही, त्यामुळे तिचे हे प्रश्न साहजिक होते. माझे नाटक, कविता, वाचन, भाषण ह्यातील रस घेणे तिला माहित असल्याने तिला विस्तारून सांगितले.
इंदौर मध्ये  त्या काळी मोहल्ल्या मोहल्ल्यातून गणेशोत्सवासाठी नाटके बसवली जात. गणेश कॉलनी साठी १९७०  साली "प्रेमा तुझा रंग कसा" हे नाटक इंजिनिअरिंग कॉलेज च्या प्रोफेसर फडक्यांनी बसवले.मी त्यात "बच्चा" ची भूमिका केली होती. रंगीत तालीम बघायला त्यांनी काकूंना बोलावले. काका फडक्यांचे सहकारी. काका आणि काकू दोघांचा सांस्कृतिक  पिंड पुणेरी हवामानात पोसलेला. त्यांचा दबदबा इंदौरच्या सांस्कृतिक वर्तुळात मान्य झालेला. त्यामुळे मनावर दडपण होते. त्या आल्या, त्यांनी तालीम बघितली, हव्या तिथे सूचना दिल्या. अतिशय सौम्य आणि प्रसन्न चेहरा, मन मोकळे हसणे, विनोदी किस्स्यांची रेलचेल.  त्या तीन तासात त्यांनी आम्हा होतकरू नटांवर कुठलेही दडपण येऊ दिले नाही. त्यांची माझी ती पहिली प्रत्यक्ष  भेट. पुढील पाच वर्षात अशा अनेक भेटी घडणार होत्या आणि माझी सांस्कृतिक जाण थोडी प्रगल्भ होणार होती. 

काकांच्या पुढाकाराने आणि काकूंच्या सांस्कृतिक संरक्षणाखाली इंजिनिअरिंग कॉलेजमधील मराठी मुलांनी "महाराष्ट्र इंजिनियर्स" ही संस्था सुरु केलेली होती. संस्थेच्या दोन दिवसीय वार्षिकोत्सवाशिवाय ह्या संस्थेतून विविध स्पर्धांसाठी - एकांकिका,भावगीत, नाट्यवाचन, वादविवाद- कॉलेजसाठी काकू स्पर्धक तयार करत. त्या काळात इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये मुली ही एक दुर्मिळ कमोडीटी असे. एकांकिकांसाठी मुली मात्र कॉलेज बाहेरच्या घ्याव्या लागत . काकुंमुळे हा प्रश्ण सहज सुटे. त्यांच्या ' भजनी मंडळ' ' सुगम संगीत मंडळ' ह्या संस्था मदतीला धावून येत. एका वर्षी तर " महिला मंडळात भाऊगर्दी" ही एकांकिका त्यांनी बसवली आणि त्यासाठी अनेक तरुण मुलींचे महिला मंडळ उभे केले ! "महाराष्ट्र इंजिनियर्स" च्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी होऊ घातलेल्या इंजिनियर्स मध्ये ह्यामुळे चुरस असे. तालमीची जागा म्हणजे काकूंचे "हिरवळ" हे दुमजली घर. घरात "सरांचा" (काकांचा) वावर. ह्या 'सुरक्षित' वातावरणात आपल्या बी ए / बी एस्सी शिकणाऱ्या मुलीना पाठवण्यास पालकांना संकोच वाटत नसे.

"महाराष्ट्र इंजिनियर्स" मध्ये माझा  शिरकाव झाला तो "पाहुणा कलाकार" म्हणून कारण मी सायन्स कॉलेज चा विद्यार्थी. महाराष्ट्र साहित्य सभेच्या शारदोत्सवात एकांकिका स्पर्धेत त्यांनी "नाटक बसत आहे" ही एकांकिका बसवली. त्यातील लेखक हे पात्र करणारा कुणी बहुदा प्रयोगाच्या २ दिवस आधी गहाळ झाला. भूमिका इनमिन साडेतीन मिनिटाची. माझा "बच्चा" पाहून काकूंनी मला बोलावणे धाडले. मी 'हिरवळी'वर पोहोचलो. थोडी धाकधूक होती कारण सरांचा दरारा ऐकून ठाऊक होता त्यांच्या घरी जाणे म्हणजे …   त्या नंतर मात्र त्या "हिरवळी"वर माझ्या बेकारीच्या वर्षात मला अनेक विसाव्याचे क्षण मिळाले.

काकूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक एकांकिका केल्या त्यातील कायम स्मरणात राहतील अशा "खलीत्यांची लढाई" आणि "सदू आणि दादू" !
कुठल्याही परिसंवादात किंवा वादविवाद स्पर्धेत द्यायचे भाषण मी आधी काकूंना दाखवत असे. त्या अधिक संदर्भ देत असत. काही मुद्द्यांवर त्यांचे आणि माझे मत एक नसे. कारण मी तसा त्या काळातला 'विद्रोही' ! पण त्या माझी मते शांतपणे ऐकून घेत. मला अधिक वाचायला लावत. "बघ तुला पटतंय का " असे म्हणत. १९७३-७५ ह्या काळात मी बेकार तर होतोच पण हळू हळू system विरोधी होऊ लागलो होतो. माझ्या त्या भावनेला भलते वळण न मिळता एक सृजनात्मक वळण मिळाले त्याचे बरेच श्रेय काकूंना … लिहित रहा … कविता लिही, लेख लिही असे त्या सारखे बजावत. काय लिहिलेस असे आवर्जून विचारत, सुधारणा करत, प्रोत्साहन देत. माझ्या हातून ज्या काही दहा पाच कविता त्या काळात लिहिल्या गेल्या त्या त्यांनी आवर्जून वाचल्या, आपली स्पष्ट मते दिली, पण नामोहरम मात्र केले नाही.

१९७५ साली (एकदाची) नोकरी लागली आणि मी त्यांचा निरोप घ्यायाल गेलो. त्यावेळी "चल, सुटलास एकदाचा, पण त्या  कवितेला सुटू देऊ नकोस आपल्या कचाट्यातून" अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. ज्यांनी ज्यांनी माझ्या घडण्याला हातभार लावला, बिघडण्यातून वाचवले आणि अवघडण्यातून मोकळे केले त्यांच्या अपेक्षांना मी उतरू शकलो नाही ही एक खंत उरी उरलेली. कारण पुढे निवृत्त होईपर्यंत आकडे जुळवण्यात कविता कुठे अडकली समजलेच नाही.
इंदौर सोडल्यावर इंदौरला  जाउन देखील काकूंची भेट घेणे दर वेळी जमत नव्हते. तरी जमेल तेंव्हा  त्यांना भेटत असे. ५ वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यावर त्यांना भेटलो. "आता तर तुला वेळच वेळ आहे. मग कर पुन्हा सुरुवात लिहायला " असे त्या म्हणाल्या आणि मलाच माझी लाज वाटली. त्यांनी वयाची ८० वर्षे ओलांडली होती मात्र चिंतन, मनन आणि अनेक कार्यक्रमांची  आखणी त्या करतच होत्या. "श्री सर्वोत्तम" ह्या इंदौरहून प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकाच्या यशात त्यांचा फार मोठा वाटा आहे.

दोन वर्षांपूर्वी इंदौरला त्यांना भेटलो ती आमची शेवटची भेट. त्याच उत्साहात भेटल्या. काही जुनी नांवे, आठवणी निघाल्या. " आता वय झाले रे. सगळेच आठवत नाही". मी कसा काय आठवतो असे विचारले तर हसल्या आणि म्हणाल्या " सारीच भुते विसरता येत नाहीत". त्यावेळी मी माझी वही घेऊन गेलो होतो. जवळ जवळ तासभर मी त्यांना कविता वाचून दाखवल्या. त्यांनी न कंटाळता ऐकल्या, आणि तसेच कौतुक केले. "पुढच्या वेळी येण्या आधी कळव, काही लोकांना बोलावून घेऊ आणि  छोटा कार्यक्रम करू इथेच, मी हल्ली कुठेच जात नाही". पण काही वेळा यायच्याच नसतात. उरलेली खंत हेच त्या न आलेल्या क्षणांचे देणे असते.

काकू, तुम्ही अजून आहात माझ्या साठी एक आकाश, सतत आधार वाटणाऱ्या, एक हिरवळ निवांत आसरा देणारी !!

४-४-२०१५