रविवार, नोव्हेंबर २३, २०१४

"संग, संवाद, संवेदना" - पेपर कोलाज मधून प्रगटलेला एक मानवीय संबंधांचा शोध

आपल्या परिचयाच्या माणसाचा आपल्याला अनेक वेळा नव्याने शोध लागत असतो. श्रीराम जोग हा आमच्या इंदोरच्या सांस्कृतिक जगातला एक सळसळता झरा. रंगभूमीवर निस्सीम प्रेम असलेला आणि सातत्याने नाटकातून अभिनय, दिग्दर्शन करत त्याने महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा आणि इतर स्पर्दातून अनेक पारितोषिके  मिळवली आहेत.  ह्या वर्षी त्याने दिग्दर्शित केलेले "हे घ्या एक फूल " हे नाटक नागपूर केंद्रातून प्रथम आले. दिग्दर्शन आणि अभिनय अशी व्यक्तिगत पारितोषिकेही त्याने पटकावली.  इंदोरला अधून मधून गेलो कि श्रीराम भेटतो, बहुतेक करून कुठल्या तरी लग्नाच्या रिसेप्शन मध्ये. मात्र श्रीराम मधला कलाकार मला बहुतेक इंदोर बाहेर भेटण्याचा योग असावा.

त्याच्यातला अभिनेता मला १९९० साली अहमदाबादला भेटला.  आणि त्याच्यातला चित्रकार दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या जहांगीर आर्ट ग्यालेरीत. त्याच्या पेपर कोलाजच्या सुमारे १२५ कलाकृतींचे प्रदर्शन सुरु आहे. "संग, संवाद, संवेदना" अशी थीम असलेले हे प्रदर्शन. पेपर कोलाज हा प्रकार कलाक्षेत्रात तसा उच्च वर्णीय मनाला जात नाही असे त्याच्याच बोलण्यात आले. मला मात्र कागदावर उमटलेली कुठलीही कला आवडते, आकर्षक वाटते. अज्ञानी माणसाचे हे चांगले असते. ते कुठल्याही वादात न पडता कलेचा आस्वाद घेऊ शकतात. श्रीरामच्या ह्या सर्व कलाकृतीतून माणसातील संवाद आणि संवेदना व्यक्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. घडवलेली सर्व माणसे  सुस्पष्ट आहेत आणि ती शोधावी लागत नाहीत. (हल्ली जिवंत माणसातला माणूस सुद्धा शोधावा लागतो !) त्यांच्यातील परस्पर संबंध देखील सहज प्रगटतात. मग ते एखादा राष्टीय दिवस साजरा करायला स्कूटर वर  निघालेले कुटुंब असो, एखादे प्रेमी युगल असो कि दोन सख्या असोत. ही सारी चित्रे मासिकातली रंगीत पाने हाताने फाडून मग चिटकवून तयार केलेली आहेत. मनात असलेला रंग तयार करणे सोपे असावे मात्र हवा तश्या रंगाचा कागद मिळणे कठीण! त्यातून जर एखाद्या रमणीची साडी विशिष्ट रंगातली दाखवायची असेल तर? श्रीरामची चिकाटी म्हणून मला कौतुकास्पद वाटते.  चित्रातली माणस एकमेकाशी संवाद साधताना दिसतात, त्यांचे कोम्पोजिशन बघताना  श्रीरंग मधला नाट्य दिग्दर्शक जाणवत राहतो. कागदाच्या तुकड्यातून हवी असलेली देह बोली प्रगट  करणे सोपे नाही कारण हे कागद कुठल्याही रेखाकृतीवर चीटकावलेले नाहीत! 

परवा भेटल्यावर श्रीरामने आधी दिलेली बातमी : " मी बँकेच्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली " तो घेत असलेला मोकळा श्वास त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. बँक आणि कला ह्यांचा खरे तर अर्थाअर्थी संबंध नाही मात्र बर्याच जणांना बँकेत नोकरी करत असताना त्यांच्या जीवनातला खरा अर्थ उमगला हे मानायला हवेच ! बँकेचे हे ऋण श्रीराम देखील मान्य करेल …
निवृत्ती नंतर श्रीराम पूर्णपणे रंगभूमी आणि चित्रकलेत स्वत:ला झोकून देईल आणि आपली कला साधना अधिक मोकळेपणाने सुरु ठेवेल ह्यात शंका नाही
मित्रा, पुढील 'अर्थ'पूर्ण जीवनासाठी अनेक शुभेच्छा !!