मंगळवार, सप्टेंबर १७, २०१९

*पत्र्याच्या पेटीतील तळाशी सुकलेलं दुसरं पान*



धरलेली प्रत्येक वाट अनोळखीच असते. शोधून शोधूनहि ओळखीच्या खुणा कुठे सापडतच नाहीत. प्रत्येक झाड नवं, त्यावरच पान नवं, त्यावरल फूल नवं, त्या फुलाचा गंध  नवा. पण ह्या नवीनतेन भारावून जाण्यापेक्षा गोंधळून जायलाच कां व्हावं ? अज्ञानात अंदाजाने बांधलेले आकार कुठेच दिसू नयेत म्हणून झालेली ही निराशा असते कि अपेक्षाभंगाची वेदना? कि स्वत:च्या अपेक्षांवरच्या वाजवी विश्वासाची कणा ताठ असलेली जाणीव? त्यापोटी दूरात नजर रोवून असलेली आशा? उचललेल्या आपल्या पावलानाच अर्थ नाही कि पायाखालची वाटच आहे अर्थशून्य? वळणा मागून वळण जाताहेत पण अजून "पुढे आलो"   ह्याची जाणीव कां होऊ नये ? प्रत्येक  वळणावर एक नवा दिशा निर्देशक, प्रत्येक  निर्देशकावर एका नव्या गावाचं नाव … साराच प्रवास असा अज्ञाताच्या पाठी आणि अखेर जाणवणार असेल त्या अज्ञाताची अतर्क्यता , नेणिवेच्याही  पलीकडील … अनाकलनीय ….

उध्वस्त क्षितीज आणि सूर्य दिशाहीन!

हे काय घडतंय? किंबहुना काहीच का घडत नाहीये? उतारावर ढकलून दिलेलं पिंप अजून थांबत नाहीये … पसरलेल्या धुक्यात एखादा आकार लपलेला आहे कि नाही? स्वत:ची स्थिती इतकी हास्यास्पद कधीच झाली नव्हती.

नोकरीच्या, कामाच्या ढालीने किती काळ निभाव लागणार?

पहाट किती लांब आहे?
*************************
उध्वस्त क्षितीज आणि सूर्य दिशाहीन
आकाश स्वच्छ नाही पुरतेच ते मलीन

असतात भोवताली चालूच हालचाली
साऱ्यात मात्र आहे मी एकटाच दीन

साम्राज्य सावल्यांचे कळसूत्री बाहुल्यांचे
तुटतील दोर आणि होईल फक्त लीन

श्वासांची फक्त ग्वाही, जगलो कधीच नाही,
हाती कधी फुलेना, कांटेही  दंशहीन!

हातात फक्त लुळे , उरलेत शब्द खुळे,
त्यांना कुठे किनारा, झालेत अर्थहीन ! 

My Photo

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा