शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१९

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले चौथे पान*



कधी कधी वाटतं मरून जावं ... अगदी सहजपणे हा विचार येतो . कां?
रात्रीच्या शांततेत छातीवर छत पेलत जेंव्हा विचारांचे घोडे उधळतात तेंव्हा ते आपलेल्या ट्रॅक पासून कितीही दूर गेले तरी रोख ह्या एकाच विचाराकडे जातो . कां? 
एखादं जालीम विष पाण्याबरोबर पोटात ढकलावं असं वाटतं. कां?
त्या महाशिवाचा अजिंक्य त्रिशूळ छातीवर पेलावा असंही वाटतं . कां?  . 
रात्रीचीच गोष्ट कां, भर दिवसा  समोरून धडधडत येणाऱ्या ट्रक समोर सायकल उभी करावी हाही विचार येतो. कां? 
मृत्यूकडे जाण्याची ओढ लागली म्हणून? जीवनापासून निराश झालो म्हणून? करण्यासारखं काहीच नाही ही जाणीव झाली म्हणून? कि सतत आपल्या भोवती आपला वास हुंगत "तो " वावरतोय , फक्त निर्धारित सामानाची वाट पहात, ही जाणीव आहे म्हणून? 
उभं राहण्याआधीच कोसळण्याची ही हौस कां? तुटत चाललोय मी! अवतीभवती गर्दी असूनही एकटा होत चाललोय मी. ... कां ? कसा? 
हंबरडा फोडावा म्हटलं तर श्वास गुदमरतो ... डोळा पाणी आणावं म्हटलं तर डोळे नुसतेच चुरचुरतात. ती नेमकी कुठली वाफ आंत दडून नुसती  होरपळून काढतेय? तो नेमका कशाचा शोध आहे ज्या साठी सारं चैतन्य , सारा उत्साह, सारी उमेद ताटकळतेय उंबरठ्यात?
किती दारं ठोठावली पण हवी असलेली हाक अजून कानी पडत नाहीये. किती वाद्यांच्या तारा छेडल्या पण हवा तो सूर जुळत नाही . कुठल्या दिशेतून येणार आहे  तो भारावून टाकणारा सुगंध? दिशा बदलली तरी आकाश तेच हा दारुण अनुभव नुसता भटक्या बनवून सोडणार ... शिवाय माथ्यावरलं वंचनेचं ओझं वाढतच जाणार ..... 

हुकल्या कितीक वाटा, चुकली जरी दिशाही,
आकाश तेच आहे, तोवर न खंत काही !
हातात कोरलेल्या, आहेत दग्ध ज्वाला,
मी सूर्य रे अनादी, कां बाळगू तमा ही?
घायाळ मोर नादी झाला जरी खुशाल
जो पेटला पिसारा, विझणार ना कधीही!
झोकात झोकले मी जहराळ प्राक्तनाला,
फुटणार कांच प्याला, समजून काय नाही?
चुकतील सूर थोड़े, गळतील पाकळ्याही,
गाण्यात या जिण्याचा शोधून गंध पाही!



1 टिप्पणी: